पाण्याच्या टाकीखाली बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, प्रशासनाने मृतदेहाला कचऱ्याच्या गाडीत टाकलं अन्… पुढे जे घडलं ते पाहून रक्त सळसळेल
जालन्याच्या परतूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पाण्याच्या टाकीखाली सापडलेला तरुणाचा मृतदेह नगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीतून वाहून नेण्यात आला. अधिकृत रुग्णवाहिका असतानाही घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता जालन्याच्या परतूर शहरात अमानुषतेचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. परतूरमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा मृतदेह चक्क नगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीतून वाहून नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात अधिकृत रुग्णवाहिका आणि शववाहिका उपलब्ध असतानाही, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनावर मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून नेण्याची नामुष्की का ओढावली? असा संतप्त सवाल आता नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, परतूर शहरातील एक युवक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाईक आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. या युवकाचा मृतदेह परिसरातील एका पाण्याच्या टाकीखाली आढळून आला. हा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला नाही. प्रशासनाने संवेदनशून्यतेची हद्द गाठत, तो मृतदेह थेट नगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीत टाकला आणि रुग्णालयाकडे रवाना केला.
विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच परतूर नगरपालिकेच्या नवीन रुग्णवाहिकेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. असे असतानाही, मृतदेह शवविच्छेदनासाठी अशाप्रकारे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मृतदेहाची अशा प्रकारे उघडपणे विटंबना झाल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ज्या शहरात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नवीन रुग्णवाहिकेचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात, तिथेच एका नागरिकाच्या मृतदेहाला कचऱ्यासारखी वागणूक दिली जाते, अशा संतप्त शब्दात नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली.
या संतापजनक प्रकाराची सखोल चौकशी करून मृतदेहाची अवहेलना करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणावर आता पोलीस आणि नगरपालिका प्रशासन काय स्पष्टीकरण देते, तसेच दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोलीत डिझेलअभावी रुग्णवाहिका नाकारल्याने बाळ दगावले
दरम्यान काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात असाच एक प्रकार समोर आला होता. एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज असताना, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशासनाने ‘गाडीत डिझेल नाही’ असे सांगत रुग्णवाहिका देण्यास चक्क नकार दिला. अखेर नातेवाईकांनी स्वतः ८५० रुपयांचे डिझेल टाकून खाजगी वाहनाची व्यवस्था केली आणि तिला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र या सर्व प्रकारात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गरोदर मातेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला. “जर तुम्ही थोडं लवकर आला असतात, तर बाळ वाचलं असतं,” या डॉक्टरांच्या शब्दांनी हवालदिल झालेल्या नातेवाईकांनी प्रशासकीय ढिसाळपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या दुर्दैवी घटनेवरून राजकीय वातावरण तापले असताना आता आणखी एक घटना घडली आहे.
