मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात भेट; नेमकी काय चर्चा? वाचा…

Ashok Chavan Meet Manoj Jarange Patil in Antarwali Sarati Jalna : भाजपचे नेते अशोक चव्हाण आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत काय घडलं? नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात भेट; नेमकी काय चर्चा? वाचा...
आयेशा सय्यद | Updated on: Mar 17, 2024 | 8:50 AM

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवाली सराटी- जालना | 17 मार्च 2024 : भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणातील मुद्द्यांवर चर्चा झाली. जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. तर सरकार म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा भाग म्हणून भेटायला आल्याने अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. तसंच पुढच्या बैठकीवरही मनोज जरांगे यांनी भाष्य केलं.

अशोक चव्हाण यांची भेटीवर प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी आलो होतो. त्यावेळी भेट झाली होती. हा मराठा समाजाचा विषय आहे आणि चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे. ही भूमिका माझी पहिल्यापासूनच आहे. सद्यस्थितीवर मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक याचा काही विषय नाही आणि मी उमेदवार पण नाही. जरांगे पाटील यांच्या समाजाच्या मागण्या आहेत आणि रास्त आहे त्यामध्ये काही तोडगा निघाला पाहिजे, आणि ही माझी भूमिका आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

मनोज जरांगे काय म्हणाले?

अशोक चव्हाण समाज म्हणून भेटायला आले होते. सरकारकडून आले आहेत का? असं मी आधी विचारले. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करु म्हणले होते ती आजपर्यंत का केली नाही. गुन्हे परत घेण्याऐवजी जास्त गुन्हे वाढत आहेत. हैदराबाद गॅझेट घेतो म्हणाले होते ते का घेतले नाही? ते समाज म्हणून करत असतील तर आम्ही अशोक चव्हाण यांना दोष देणार नाहीत. आमची फसवणूक झाली आहे हे आम्ही त्यांना ठासून सांगितले आहे. जाणून बुजून गृहमंत्री यांनी खोटे केसेस दाखल करायला लावत आहेत. सग्या सोयऱ्याची अमलबजावणी केलीं नाही आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी केली नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

24 मार्चला बैठकीचं आयोजन

आम्ही 24 तारखेला महाराष्ट्राची बैठक लावली आहे. पुढची दिशा काय ठरावाची यासाठी महाराष्ट्रातील साखळी उपोषणकर्ते, आमरण उपोषणकर्ते, स्वयंसेवक,ज्यांनी सभांचे आयोजन केले होते ते आयोजक आणि मराठा समाज यांची बैठक घेणार आहोत. 24 मार्चला सकाळी 10 वाजता अंतरवालीमध्ये बैठक होणार आहे. आता निर्णायक बैठक होणार आहे. त्यांनी त्यांची भूमिका ठरवली आहे. जातीशी गद्दारी करणारी आपली औलाद नाही, आणि आता तुम्हाला सुट्टी नाही. 24 मार्चला निर्णायक भूमिका ठरवणार आणि तुकडा पाडणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us