‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्…

कल्याणच्या आडीवली परिसरात अर्जुन काळपांडे उर्फ 'पेंद्या भाई'ची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेत त्याची मैत्रीणही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्य आरोपी अविनाश झा आणि साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. जुना वाद आणि बदला हे हत्येमागचे प्रमुख कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून पोलीस तपास वेगाने सुरू आहे.

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्...
कल्याणमध्ये मध्यरात्री धक्कादायक घटना
| Edited By: | Updated on: Jul 17, 2026 | 11:31 AM

कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अर्जुन काळपांडे उर्फ ‘पेंद्या भाई’ याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत अर्जुनची मैत्रीणही जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या रक्तरंजित गुन्ह्यामुळे नागिरकांमध्ये अतीशय दहशतीचे वातावरण असून ते मुठीत जीव धरून जगत आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल असून मुख्य आरोपी अविनाश झा आणि त्याच्या साथीदारांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अर्जुन काळपांडे आणि अविनाश झा तसेच गौरव उर्फ ‘बॉम्बे’ यांच्यात जुन्या वादातून बाचाबाची झाली होती. हा वाद पुढे वाढत गेल्यानंतर आरोपी अविनाश झा आणि त्याच्या साथीदारांनी अर्जुनवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.

केले तब्बल 12-13 वार

हल्ल्यादरम्यान आरोपींनी धारदार शस्त्राने अर्जुनवर तब्बल 12 ते 13 वार केले. या हल्ल्यात अर्जुन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अर्जुनसोबत असलेल्या त्याच्या मैत्रिणीवरही वार करण्यात आले असून तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता ‘पेंद्या भाई’

दरम्यान, अर्जुन काळपांडे उर्फ ‘पेंद्या भाई’ याचा यापूर्वी कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड परिसरातील चौकात झालेल्या संदीप राठोड हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होता. या प्रकरणात तो सुमारे दोन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. मात्र याच जुन्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अर्जुनची हत्या करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण या हत्येचं नेमकं कारण काय, ते अद्याप स्पष्ट समजलेलं नाही. पोलिसांकडून या घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे.

या हत्याकाडांप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अविनाश झा आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.

Follow Us