मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना आक्रित घडलं… प्रचार रॅलीत मोठा स्फोट; संपूर्ण कल्याण हादरलं
कल्याणमधील योगिधाम परिसरात पॅनल क्रमांक 2 मधील महायुती उमेदवारांच्या प्रचार रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. रॅलीदरम्यान विद्युत तारांचा स्फोट झाल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत होते. राज्यातील सर्वच बडे नेते सभांमध्ये व्यस्त होते. अशातच आज कल्याणमध्ये निवडणूक प्रचाराच्या सांगतेदरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. कल्याणमधील योगिधाम परिसरात पॅनल क्रमांक 2 मधील महायुती उमेदवारांच्या प्रचार रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कल्याणमध्ये धक्कादायक घटना
कल्याणमधील योगिधाम परिसरात महायुती उमेदवारांच्या प्रचार रॅली सुरू होती यावेळी रॅलीतील झेंडा टाटा कंपनीच्या विजेच्या वायरला लागल्याने जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत क्षितिज पाटील हा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महायुतीचे उमेदवार दया गायकवाड, वनिता पाटील ,गणेश कोट ,अनघा देवळेकर यांच्या प्रचार रॅली दरम्यान ही घटना घडली आहे. त्यामुळे आता योगिधाम परिसरातील विजेच्या लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवनिर्वाचित नगरसेविकेच निधन
दुसरीकडे, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील नवंनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना अहमदपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्या तिथे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. शाहूताई कांबळे यांनी नुकताच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून निवडून आल्या होत्या.
नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना मोठा धक्का बसला. बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘पक्षासाठी आणि माझ्यासाठी हा फार मोठा धक्का आहे.’ शाहूताई कांबळे यांच्या जाण्याने संपूर्ण प्रभागात शोककळा पसरली आहे. 2017 मध्ये शाहूताई कांबळे यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. फक्त 12 मतांनी त्याना हार मानावी लागली.. पण जनतेचा त्यांच्यावर विश्वास होता आणि याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
