दुष्काळात तेरावा : 60 एकरातील ऊस जळून खाक, 20 शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

| Updated on: Jan 31, 2022 | 9:30 AM

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केवळ ऊस उत्पादकांना बसलेला नाही पण महावितरणच्या कारभारामुळे नुकसान टळलेलेही नाही. लातूर तालुक्यातील भिसे वाघोली शिवारातील शॉर्टसर्किटने तब्बल 60 एकरातील ऊस जळाल्याची घटना घडली आहे.

दुष्काळात तेरावा : 60 एकरातील ऊस जळून खाक, 20 शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले
लातूर तालुक्यातील भिसेवाघोली शिवारात शॉर्टसर्किटमुळे 60 एकरातील ऊस जळाला आहे.
Follow us on

लातूर : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केवळ (Sugarcane Growers) ऊस उत्पादकांना बसलेला नाही पण महावितरणच्या कारभारामुळे नुकसान टळलेलेही नाही. (Latur) लातूर तालुक्यातील भिसे वाघोली शिवारातील शॉर्टसर्किटने तब्बल (Sugarcane fire) 60 एकरातील ऊस जळाल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटच्या एका ठिणगीमुळे अवघ्या काही वेळात तब्बल 60 एकरातील ऊस कवेत घेतला. या भागात लगतच ऊसाचे फड असल्याने 20 शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच विलास साखर कारखान्याच्या अग्निशमन पथकाने हि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्याने ही आटोक्यात आणण्यात अपयश आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळेच अशा घटना वाढत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

मांजरा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. दिवसेंदिवस या क्षेत्रात वाढ होत आहे शिवाय गाळपाची सोय असल्याने सर्वात मोठ्या नगदी पिकाचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होत आहे. भिसेवाघोली येथील ऊसही तोडणीलाच आला होता. मात्र, रविवारी दुपारी अचानक आग लागून ऊसाचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. या भागातील शेतकऱ्यांचे ऊस हेच मुख्य पीक आहे. यावरच वर्षभराचे आर्थिक नियोजन असते मात्र, अवघ्या काही वेळातच तब्बल 60 एकरातील ऊस जळून खाक झालेला आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असा विश्वास लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांनी दिले आहे.

महावितरणकडून पंचनामा

शॉर्टसर्किटमुळेच ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती होताच आ. धीरज देशमुख यांनी महसूल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सुचना केल्या होत्या. आगीत केवळ ऊसाचेच नाही तर इतर शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे. ठिबकसिंचनाचे संचही जळून खाक झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती महावितरण आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानुसार पंचनामे करुन आता मदतीसाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

तरीही मांजराकडून तोड होणारच

मांजरा व विकास सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतील हे ऊसाचे क्षेत्र आहे. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरुन निघणार नाही पण जळीत ऊसाची देखील तोड मांजरा साखर कारखाना करणार असल्याचे आ. धीरज देशमुख यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल. शिवाय महसूल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुचना देऊन लवकरात लवकर बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

उन्हाळी हंगाम : राज्यात विक्रमी कांदा लागवड, खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार का?

नांदेड जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनची विक्रमी लागवड

Organic Farming: सेंद्रीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज : भगतसिंग कोश्यारी