शरद पवार महाराष्ट्राचे नेते कसे? हे तर तालुक्याचे नेते; राज ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

Raj Thackeray on Sharad Pawar : राज ठाकरेंची लातूरमध्ये सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी तालुक्याचे नेते म्हणत शरद पवारांवर टीका केली आहे. तसंच राज्यात होत असेलल्या विधानसभा निवडणुकीवरही राज ठाकरे बोललेत. वाचा सविस्तर...

शरद पवार महाराष्ट्राचे नेते कसे? हे तर तालुक्याचे नेते; राज ठाकरे यांचा घणाघाती हल्ला
राज ठाकरे, शरद पवार
Image Credit source: ANI
| Updated on: Nov 06, 2024 | 1:45 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या रेणापूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याकडे पाहिलं पाहिजे. शरद पवार तीनदा मुख्यमंत्री झाले. केंद्रात कृषी मंत्री झाले. एकदा बारामती तालुक्यात जाऊन पाहा. जेवढे उद्योग धंदे आले ते मराठवाड्यात आणता आले नसते. विदर्भात आणता आले नसते. इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो. हे महाराष्ट्राचे नेते कसे होऊ शकतात. हे तर तालुक्याचे नेते…, असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवारांवर निशाणा

१९९९ साली राष्ट्रवादीचा जन्म झाला. तो जन्म झाल्यावर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं आता धर्म आणि हिंदुत्वाच्या गोष्टी छाटायच्या कशा. लोकांना बाहेर कसं आणायचं. मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून जातीचं राजकारण सुरू झालं. प्रत्येकाला जातीचा अभिमान असतो. जातीबद्दल प्रेम असणं वावगं नाही. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे चुकीचं आहे. नेमक्या याच गोष्टी या लोकांनी केल्या. तुमची माथी भडकावली. आपण मूळ विषयाकडे जायला तयार नाही. शेतकरी आत्महत्या करतो कुणाचं लक्ष नाही. रोज आत्महत्येचे आकडे वाढत आहे. कुणाचं लक्ष नाही. तरुण शेती सोडून शहरात जातो. कुणाचं लक्ष नाही. कृषी विद्यापीठ ओस पडले. त्याकडे कुणाचं लक्ष नाही, असं म्हणत तरूणांच्या प्रश्नांकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे.

महिलांच्या सुरक्षेवर भाष्य

राज्यात लहान मुलींवरील बलात्काराचं प्रमाण वाढलं. तरुण मुली आणि महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढलं. असा नव्हता महाराष्ट्र आहे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न आहे. विहिरीला पाणी लागत नाही. कुठून शेती करणार आहे. कोणत्याही गोष्टीकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून यासाठी म्हणून जातीपातीचा विषय तुमच्यासमोर आला. भांडा. बसा वाद घालत. बसा द्वेष पसरवत. त्यातून काही हाताला लागणार नाही. मूळ विषयाला लक्ष न दिल्याने त्यातून काही हाती लागणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी महिला सुरक्षेवर भाष्य केलं आहे.

मी तुम्हाला विश्वास देतो, या सर्व गोष्टी सहज शक्य आहे. नक्की होऊ शकतात. फक्त त्यासाठी इच्छा शक्ती हवी. ती माझ्याकडे आहे. तुडूंब भरलेली आहे. माझा प्रत्येक उमेदवार ही महाराष्ट्राची येणारी ताकद आहे. या राज्यात सत्ता आणायची असेल तर प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. उमेदवार महत्त्वाचा आहे, असं राज ठाकरे म्हणालेत.