
Omraje Nimbalkar on EVM Hack: ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचा विरोधकांचा दावा आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा अधिक गाजला. निवडणुकीतील पराभवाचं खापर अनेकदा ईव्हीएमवर फोडण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी तर निवडणुकीतील घोळावर, मतदान प्रक्रियेतील गडबडीवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यांचा हायड्रोजन बॉम्ब अजून पडलेला नाही. उद्धव ठाकरे , संजय राऊत यांच्याकडूनही याप्रकरणी अनेकदा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पण त्यांचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मात्र ईव्हीएमविषयी वेगळा साक्षात्कार आहे. त्यांनी ईव्हीएममध्ये घोळ असता तर आपण निवडून कसे आलो असतो असा सवाल गेल्या आठवड्यात केला होता. आता तर त्यांनी ईव्हीएममध्ये घोळ होऊ नये यासाठी त्रिसुत्रीच सांगितली. एकीकडे पक्ष श्रेष्ठी ईव्हीएमविरोधात शंखनाद करत असताना खासदारांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे.
तर मी खासदार झालो असतो का?
तीन दिवसांपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएममधील घोळावर मोठे भाष्य केले होते. त्यांनी ईव्हीएममधील घोळाचे दावे फेटाळले. जर ईव्हीएममध्ये खरोखर घोळ असता तर मी खासदार झालो असतो का? असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची होती. मग घोळ घालून मला पाडले नसते का? मी खासदार झालो याचाच अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असा दावा त्यांनी केला. एकीकडे संजय राऊत यांनी ईव्हीएमविरोधात मोर्चा उघडलेला असताना निंबाळकर यांच्या वक्तव्याने पक्षच अडचणीत आल्याचे मानले जात होते.
ईव्हीएम घोळावर 3 जालीम उपाय
तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी त्यांनी मतदान केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ईव्हीएम हॅक होऊ नये यासाठी तीन जालीम उपाय सुचवले. हे उपाय केले तरी ईव्हीएममधील घोळ होणार नाही आणि करण्याचा प्रयत्न झाला तर तो समोर येईल असा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.
मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आपण निवडणुका सध्या ईव्हीएमवर लढवत आहोत. आपण जर या यंत्रणेविषयी अविश्वास व्यक्त केला तर सर्वसामान्य नागरिकांना काय वाटेल असा सवाल त्यांनी केला. माझी भूमिका याविषयी स्पष्ट आहे. तर ईव्हीएममध्ये घोळ होऊ नये यासाठी मी कार्यकर्त्यांना दोन ते तीन गोष्टी चेक करायला सांगितल्या आहेत असे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
1.सकाळी मॉक पॉल होतात. त्यावेळी निवडणूक अधिकारी 50 मतं टाकून दाखवतात. त्याचा डेमो देतात. केंद्र अधिकारी जेव्हा ही 50 मतं टाकतात. तेव्हा ती संबंधित चिन्हाला गेलीत की नाही हे तपासलं पाहिजे.
2.त्यानंतर हे ईव्हीएम मशीन रिसेट केले की नाही याची खात्री करा. मशीन लॉक केली तर त्यात बदल होत नाही असा दावा निंबाळकरांनी केला.
3.संपूर्ण मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकारी हे मशीन सील करतात. त्यावेळी मशीनवरील जो सीरीअल नंबर आहे तो नोंदवून ठेवा. तर मतमोजणीवेळी त्याच सीरीअल क्रमांकाची मशीन आली की नाही हे तपासा.
मग घोळ होतो कसा?
निंबाळकरांच्या मते, ईव्हीएम मशीनमधून घोळ होत नाही. पण एकाच ठिकाणी बोगस मतदान घडवून आणल्या जाते. 600, 600 अथवा अधिकचं एकगठ्ठा मतदान केल्या जाते. दुसर्या जिल्ह्यातून बोगस मतदार आणून मतदान घडवून आणल्या जाते. निवडणूक आोयागाने अशा बोगस मतदारांवर गुन्हे नोंदवल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला.