MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
MPSC Paper Leak : MPSC ने मंगळवारी रात्री औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या पेपर फुटीला जे कारण ठरलं ते चक्रावून सोडणारं आहे.

MPSC पेपर लीक प्रकरणाच्या तपासात एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. पेपर फुटीच्या आरोपांमुळे मंगळवारी रात्री MPSC ने औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेचा पेपर फुटल्याचे आरोप सुरु होते. आता असं समोर आलय की, या पेपर फुटीला एक लव्ह स्टोरी जबाबदार आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेतील घटनाक्रम थक्क करणारा आहे. या संपूर्ण प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने एमपीएससीमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत.
MPSC परीक्षेची प्रक्रिया अनेक महिने चालू असते. त्यामुळे या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया विद्यमान अध्यक्ष रुजू होण्यापूर्वीच पूर्ण झाली होती. केवळ एकच विद्यार्थ्याकडे पेपर मिळाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असला तरी आयोगाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ एकाकडेच पेपर गेला असतानाही इतर सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. एका प्रेम कहाणीचा हा फटका इतरही विद्यार्थ्यांना बसला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी MPSC च्या परीक्षेची तयारी करतात. त्यासाठी प्रचंड कष्ट घेत असतात. राहण्याचे, दोनवेळच्या जेवणाचे हाल सोसून हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. दोन लोकांच्या प्रेमसंबंधांमुळे या विद्यार्थ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागणं हे खूप दुर्देवी आहे.
मध्यंतरी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून प्रेझेंटेशन करुन MPSC चा पेपर फुटल्याचा दावा केला होता. पण MPSC ने मात्र त्यावेळी हे आरोप मान्य करण्यास नकार दिला होता. पण आता भरती प्रक्रिया रद्द करणं म्हणजे पेपर फुटी झाली हे वास्तव आहे.
रोहित पवारांनी पेपर फुटीच्या या प्रकरणात काय आरोप केलेला?
मध्यंतरी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून प्रेझेंटेशन करुन MPSC चा पेपर फुटल्याचा दावा केला होता. पण MPSC ने मात्र त्यावेळी हे आरोप मान्य करण्यास नकार दिला होता. पण आता भरती प्रक्रिया रद्द करणं म्हणजे पेपर फुटी झाली हे वास्तव आहे. “नंदूरबारच्या कौटिल्य अकादमीतील एका विद्यार्थ्यांना 90 टक्के प्रश्न आधीच मिळाले होते. 22 मार्च 2026 ला परीक्षा होती. पण 20 मार्चलाच परीक्षेचे प्रश्न मिळालेले. त्यामुळे या मुलांना अभ्यास करता आला. पैसे मिळाल्यावर तो माणूस व्हॉट्स अपवर प्रश्न पाठवायचा. दोन ते तीन मिनिटांनी डिलिट फॉर ऑल करायचा. ते डाऊनलोड केलेले प्रश्न एकाने आपल्या मित्राला पाठवले. त्यामुळे त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत” असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
