Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द, पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून मार्च महिन्यात एक परीक्षा घेण्यात आलेली. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा करण्यात आलेला. नीट सारखाच हा पेपर फुटीचा प्रकार होता. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी सुरू असलेली संपूर्ण भरती प्रक्रिया MPSC कडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च महिन्यात औषध निरीक्षक गट-ब पदासाठी परीक्षा झाली होती. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर 20 मार्चलाच लीक झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या चौकशीनंतर आयोगाने हा मोठा निर्णय घेतला. परीक्षा पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी भरती रद्द करण्यात आली. लवकरच फेरपरीक्षा घेण्याची एमपीएससीची तयारी आहे. पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज किंवा परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. रोहित पवार यांनी यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली होती. प्रेझेंटेशनद्वारे MPSC औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा केला होता.
काल ही परीक्षा देणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज यांनी या विषयात लक्ष घालण्याचं आश्वासन या विद्यार्थ्यांना दिलं होतं. ते या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार होते. पण त्याआधीच शासनाने ही MPSC औषध निरीक्षक, गट-ब पद भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एकप्रकारे रोहित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचा विजय आहे.
#पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर… pic.twitter.com/OZMkg6pplf
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2026
40 -40 लाखाला पेपर विकला गेला
“पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचे आयोगाचे स्पष्टीकरण कदापि मान्य करण्यासारखे नाही. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत 40 -40 लाखाला पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे आणि आयोगाला देखील ही वस्तुस्थिती माहीत आहे” असा दावा रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये केला आहे.
