विमान तिकिटाचा दर कमी होणार, ATF वरील व्हॅट कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
ATF VAT Cut : हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून एटीएफवरील व्हॅटमध्ये 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील यु्द्धामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या काही काळापासून विमान प्रवासही महागला आहे. अशातच आता हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून एटीएफवरील व्हॅटमध्ये 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील 16 विमानतळांवरून प्रवास करणार्या 75 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे.
विमानाच्या इंधनावरील कर कपात
समोर आलेल्या माहितीनुसार, विमान कंपन्यांकडून व्हॅट कमी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्यात आले होते. त्यानंतर केंद्राकडून अधिक प्रमाणात व्हॅट आकारणाऱ्या राज्यांना हा कर कमी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा व्हॅट 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून विमान इंधनावरील कर कमी केल्याने राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होणार आहे. कारण महाराष्ट्रात 16 विमानतळे असून, देशातील सर्वाधिक वार्षिक हवाई प्रवासी वाहतूक महाराष्ट्रातून केली जाते. दरवर्षी सुमारे 7.5 कोटी प्रवासी हवाई प्रवास करतात, तर दररोज सुमारे 2 लाख प्रवासी विमानसेवेचा वापर करतात. व्हॅटमध्ये करण्यात आलेली ही कपात राज्यातील सर्व विमानतळांवरील उड्डाण संचालनाला मदत करणार आहे. मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा फायदा होणार आहे. जागतिक स्तरावरील आव्हानांमुळे विमान भाड्यात वाढ होण्याचा दबाव असतानाही, या निर्णयामुळे विमान तिकिटांचे दर नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.
Due to the West Asia crisis, the Indian aviation industry is facing certain issues like air space closures, uncertain operations, spike in ATF prices. During these times, under the leadership of Hon’ble PM Shri @narendramodi ji, the government of India has given multiple respites… pic.twitter.com/Ayd671wWbq
— Ram Mohan Naidu Kinjarapu (@RamMNK) May 15, 2026
राम मोहन नायडू यांनी मानले आभार
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. नायडू यांनी म्हटले की, विमान वाहतूक उद्योगातील एक महत्त्वाचा खर्च म्हणजे एटीएफवरील व्हॅट, जो राज्य सरकारांकडून आकारला जातो. नागरी विमान वाहतूक मंत्रालय गेल्या काही काळापासून, विशेषतः या संकटाच्या काळात, राज्य सरकारांशी हा व्हॅट कमी करण्यासाठी सातत्याने चर्चा करत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी पुढाकार घेत आजपासून एटीएफवरील व्हॅट 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय जाहीर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.