धो धो नव्हे, जीवघेणा पाऊस, कुणी वाहून गेलं, तर कुणाला शॉक लागला… राज्यातील पावसाचे बळी किती?
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केले आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी जीवघेण्या घटना घडल्या आहेत. पालघरमध्ये भिंत कोसळून आणि नदीत वाहून जाण्याने, तर नागपूरमध्ये शॉक लागून जीवितहानी झाली आहे. हा जीवघेणा पाऊस राज्यासाठी दुर्दैवी ठरत असून, यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई-ठाण्यासह संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कालपासून राज्यभर धो धो पाऊस कोसळत आहे. हा धो धो कोसळणारा पाऊस आता जीवघेणा ठरताना दिसत आहे. आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. काल आणि आज झालेल्या भयानक पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. कुणी पुरात वाहून गेलंय. कुणाला शॉक लागून मृत्यू आला तर कुणाच्या अंगावर भिंत कोसळल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आभाळ फाटलेलं असतानाच काही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
चाळीची भिंत कोसळली आणि…
पालघरमध्ये चाळीची भिंत कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालघर शहरातील आगरी पाडा परिसरात चाळीची भिंत अंगावर कोसळून राबिया शब्बीर सय्यद (वय 47) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभर पालघर शहरात पाऊस सुरु होता. सायंकाळच्या सुमारास राबिया सय्यद या चाळीतील त्यांच्या खोली जवळच्या भिंती लगत साचलेले पाणी उपसत असताना कमकुवत झालेली भिंत अचानक कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नदीत उतरले ते आलेच नाही…
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली असताना सूर्या नदीत मासेमारीसाठी नदीत उतरलेल्या एका शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. डहाणू तालुक्यातील पेठ केदारपाडा येथील विठ्ठल जाने केदार हे सूर्या नदीत मासेमारीसाठी गेले असता पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रात्री शॉक लागला अन्…
नागपुरातील ताजबाग परिसरातील गौसिया कॉलनीत बुधवारी रात्री विजेचा शॉक लागल्याने रस्त्यावर एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गटार लाईनच्या खोदकामादरम्यान स्ट्रीट लाईटची भूमिगत वीज वाहिनी खराब झाली होती, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.त्याच केबलमध्ये वीजप्रवाह उतरल्याने महिला तिच्या संपर्कात आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरिकांनी मनपा आणि संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. खोदकामानंतर सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेतली गेली नसल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय.
