Monsoon Update : मुंबईत दिवसाच संध्याकाळ? काळेकुट्ट ढग जमले, गार हवा.. मान्सूनची अपडेट काय?

मुंबईत सकाळीच काळे ढग दाटून गार हवा सुटली, जणू काही संध्याकाळचा अनुभव. राज्यात मान्सून उशिरा पोहोचल्याने चिंतेचे वातावरण आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा केवळ 10% राहिल्याने पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे, तर पेरण्या खोळंबल्याने शेतकरीही हवालदिल आहेत.

Monsoon Update : मुंबईत दिवसाच संध्याकाळ? काळेकुट्ट ढग जमले, गार हवा.. मान्सूनची अपडेट काय?
मान्सूनची अपडेट काय ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 16, 2026 | 10:48 AM

जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी अजून राज्यात पावसाचं आगमन झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. तर पेरण्या खोळंबल्याने बळीराजा टेन्शनमध्ये आला आहे. त्यातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा केवळ 10 टक्केच राहिल्याने मुंबईकरांवरही मोठं संकट घोंगावू लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी आजचा दिवस वेगळाच ठरला आहे. मुंबईत 9 ते 10च्या सुमारास काही भागात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. त्यामुळे पाऊस येणार की काय अशी चिन्हे दिसत होती. दुपार किंवा संध्याकाळपर्यंत तरी पाऊस पडेल, अशी चर्चा सध्या मुंबईकरांमध्ये रंगली आहे.

आज सकाळपासूनच मुंबईचं हवामान ढगाळ आहे. सकाळी 9 ते 10च्या दरम्यान तर आकाशात काळेकुट्ट ढग जमले होते. गार वारा सुटला होता. ऐन सकाळीच संध्याकाळचा फील येत होता. गार वाऱ्यामुळे वातावरणात गारवा मिळाल्याने मुंबईकर सुखावले होते. पाऊस नसला तरी गारवा निर्माण झाल्याने उकाड्यातून सुटका झाल्याची भावना मुंबईकरांच्या मनात होती. तर काळे ढग दाटून आल्याने पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे आज छत्री आणायला हवी होती, अशा भावना मुंबईकर बोलून दाखवत होते. संध्याकाळपर्यंत तरी पाऊस येऊ दे रे बाबा , असं साकडंही मुंबईकर देवाला घालताना दिसत होते.

पावसाअभावी निम्मा जून कोरडाच

मुंबईपाठोपाठ पुणेकरही मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. प्रतिकूल वातावरणामुळे एकीकडे मान्सूनचा प्रवास गेल्या आठवडाभरापासून कोकणातच रेंगाळत असताना पुण्यात यंदा पूर्व मोसमी पावसाने ही निराशा केली आहे. मान्सूनच्या आगमनाची संकेत घेऊन येणारा हा पाऊस यंदा जूनमध्ये बरसलाच नाही. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आयएमडी नोंदवही जूनच्या पहिल्या पंधरा दिवसात 0 पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 2014 मध्ये पुण्यातील परिस्थिती नोंदवण्यात आली होती.

कधी बरसणार ?

दरम्यान, हवामान खात्याची नवी अपडेट समोर आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 4-5 दिवसात मान्सून अनेक राज्यात दाखल होणार आहे. त्यानंतर या राज्यांमध्ये वादळ, अतिमुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. खासकरून 15 जून नंतर पश्चिम बंगाल, तेलंगना, ओडिशा, झारखंड आणि बिहार आदी राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे.

तर, आयएमडीच्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसात महाराष्ट्र, कर्नाटकचा काही भाग आणि तेलंगना, ओडिशा, झारखंड, बिहारच्या काही भागात पावसाला अनुकूल वातावरण होणार आहे. या भागात लवकरच चांगला पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे.

 

Follow Us