
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात येणार असून पुणे शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर मनसे नेते अमित ठाकरे आज आशिष शेलार यांची भेट घेणार. दोन दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. रमी प्रकरणात माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आक्रमक झाले असून त्यांनी रोहित पवारांना मानहानीची नोटीस बजावली आहे. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणेच कशाला? असा सवाल विचारत रोहित पवारांनी कोकाटेंवर टीका केली आहे. शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवण्याची गरज नाही, असा टोलाही लगावला. कोकणात आजपासून ग्रुपबुकिंग एसटी , गणेशोत्सवासाठी 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान सेवा सुरू असेल. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांनी ग्रुप बुकिंग केलेल्या बस रविवारपासून सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे . यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
हिमाचल प्रदेशातील अनेक भागात सुरू असलेल्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, बंद केलेल्या 339 रस्त्यांपैकी 162 रस्ते मंडी जिल्ह्यातील आणि 106 रस्ते कुल्लूमधील आहेत.
जयपूरमध्ये सततच्या पावसामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसामुळे आमेर पॅलेसच्या दिल-ए-आरम बागेची 200 फूट लांबीची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने दोन मोटारसायकलींचे नुकसान झाले.
यंदा लालबाग इथे जामनगरच्या वनताराची थीम असल्याची चर्चा आहे. त्यासोबतच दक्षिण भारतातील प्रख्यात तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखावा प्रमुख आकर्षणापैकी एक असेल. लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात जास्त गर्दी होणारा गणेशोत्सव मंडळ आहे. 11 दिवसात येथे येणाऱ्या भक्तांची संख्या कोट्यवधींमध्ये पोहोचते.
संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे ठाकरे गटाला रामराम ठोकणार असल्याचं समोर आलं आहे. त्र्यंबक तुपे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये, सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने श्रीनगर जिल्ह्याच्या बाहेरील दाचीगामच्या जंगलात दहशतवाद्यांचा एक लपण्याचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. तथापि, सुरक्षा दलांच्या कारवाईपूर्वीच दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले होते.
वानखेडे स्टेडियम येथे एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात येत आहे. या संग्रहलायचे उदघाटन शरद पवार, सुनील गावस्कर आणि मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या संग्रहालयात मुंबई क्रिकेट सुरु होण्याआधीपासूनच्या आठवणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून देशात रान पेटवले आहे. त्यातच शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल येथील माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल मध्ये 11 हजार 600 जणांनी दोनदा मतदान केले असल्याची माहिती समोर आणली आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातून नुकतीच निवडणूक लढवली होती, मात्र भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या आणखी एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. सहकारी सोसायटीचे एक लाख सत्तर हजार रुपयांचे कर्ज फेडता न आल्याने नेवासा तालुक्यातील शेतकरी नानासाहेब ठोंबळ यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन संपवले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. जुनोना जंगल परिसरात कुड्याच्या भाजीची पाने तोडायला गेलेल्या पिता-पुत्रावर अचानक अस्वलाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली आहे. सकल मराठा समाज बांधवांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईला जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री असताना गणेशोत्सवाच्या माध्यामातून कोकण परिसरात अधिकाधिक संख्येने एसटी गाड्या सोडून ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुंबई महानगर प्रदेशातील कोकणवासीयांवर आपली छाप सोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यंदाही या प्रवासावर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहील याकडे लक्ष केंद्रीत केल्याची माहीती समोर आली आहे. वर्तकनगर, चरई, खोपट, लोकमान्य नगर, बाळकूम, डोंबिवली, कल्याण अशा विविध भागातून मोठ्या संख्येने असलेल्या कोकणवासीयांना मोफत बससेवा उपलब्ध व्हावी यासाठी शिंदे यांच्या समर्थकांनी २ हजारहून अधिक एसटी गाड्यांची नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. महापालिकेत १३१ नगरसेवक निवडून येणार आहेत. ठाण्यात एकूण प्रभागांची संख्या ३३ असणार आहे. त्यापैकी ३२ प्रभागात ४ नगरसेवक तर फक्त एका प्रभागात ३ नगरसेवक असणार आहे.
उभ्या असलेल्या ट्रकच्या टायर आग लागल्याची घटना घडली आहे. ट्रकच्या जळत्या टायर जवळ एक हजार लिटर क्षमतेची डिझल टाकी होती.. मात्र डिझेल टाकीला आग लागण्या आधीच ती विझविण्यात यश आले आहे. हालोली गावाच्या हद्दीतील गुजरात वाहिनीवरील अँपल इन हॉटेल जवळ ही घटना घडली आहे.
गणेश उत्सवासाठी चिपळूण पोलिसांकडून सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांना आयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहेत. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशिष्ट ड्रेस कोड वापरण्यासही सांगितलं आहे. तसेच रात्री 10 नंतर साऊंड सिस्टिमला बंदी घालण्यात आली आहे.
भिवंडीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे डॉक्टरचा बळी गेल्याची घटना घडली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीवर प्रवास करत असताना तोल गेल्यानं ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
अमित ठाकरे यांनी राज ठाकरेंना पाठिंबा देण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. “जसं मनसेला, राज ठाकरेंना नाशिकमध्ये संधी दिली तशीच संधी एकदा मुंबईतही देऊन पाहा असं आवाहन अमित ठाकरे यांनी केलं आहे. सर्व समस्यांच्या प्रश्नांना एकच उत्तर ‘राज ठाकरे’ असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“पाकसोबत क्रिकेट खेळणार, आता सिंदूर गेला कुठे?. जगभरात कशासाठी शिष्टमंडळं पाठवली होती. आमची लढाई पाकसोबत आहे, हे सांगायला शिष्टमंडळं पाठवलीत. कबुतरं, कुत्रे आणि हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. पण ही भूतदया पहलागमच्यावेळी कुठे जाते?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
“मोदींच्या आजूबाजूला सध्या कितीतरी भ्रष्टाचारी. बांग्लादेशींना विरोध करता, शेख हसीना यांना पाठिंबा देता. माझी उंची हिमालयाची पण माझं जिगर सह्याद्रीच आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
गोरखपूरवरून मुंबईला येणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये टॉयलेटमध्ये डेड बॉडी सापडली आहे. आर पी एफ आणि जीआरपी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली आहे. जीआरपी आणि आरपीएफ त्याचा तपास करत आहे.
केंद्र शासनाच्या सहकार विभागाची विशेष समिती आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. केंद्रीय सहकार विभागाचे सहसचिव दिनेशकुमार वर्मा यांचा समितीत समावेश आहे. समितीकडून जिल्ह्यातील जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ याबरोबरच इतर सहकारी संस्थांना भेटी दिल्या जात आहेत. सहकारी संस्थांना भेटी देत तेथील कामकाजाचा सहसचिव दिनेश कुमार वर्मा यांच्याकडून आढावा घेतला जात असून सुधारणा करण्यासंदर्भात सूचना केल्या जात आहे.
आज सर्वपक्षीय मराठा समाजाची पुण्यात रोकडोबा मंदिरात बैठक मुंबईला जाण्याचा नियोजनासाठी बैठक असल्याची माहिती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली.
गडचिरोलीत भाजपने तेजस्वी यादव यांच्या विरोधात पोलीस तक्रार देण्यात आली. बिहारच्या गया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभेच्या विरोधात तेजस्वी यादव यांनी ट्विट करत पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी स्थानिक आमदारांनी ही तक्रार दिली आहे.
चिपळूण जवळ वाहतुकीची एक लाईन बंद करून खड्डे भरण्याचा काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. वाशिष्टी पुलाजवळील हवेची एक लाईन बंद करून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपा नेते रणजितसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली
आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला, उद्धव साहेबांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या, आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी आहोत, असे खासदार संजय राऊत म्हणाले. उद्धव साहेबांनी जी चर्चा केली ती पक्षात केली, त्यांनी आम्हाला फडणवीसांचा फोन आल्याची माहिती दिल्याचे ते म्हणाले.
जळगाव जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने बलात्कार केला. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. बस चालकाने एका शेतात नेऊन बलात्कार करत विद्यार्थिनीला धमकी दिली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन मध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळच्या ऊसेगाव येथे विदर्भ मिनरल वीज प्रकल्पात चिमणीवर चढून कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. या भागातील भूमिपुत्रांना विविध कारणांनी नोकरीवरून काढून टाकल्याने हा असंतोष निर्माण झाला आहे. नोकरीवर पूर्ववत कायम न केल्यास या कामगारांनी चिमणीवरून उडी घेत आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय.
डोंबिवलीत रस्त्यावरील खड्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश हॉल समोर मनसेचे अनोखे आंदोलन. रस्त्यातील खड्ड्यात बसून आरती करत प्रशासनाला खड्डे बुजवण्याची सद्बुद्धी देण्याची केली मागणी
गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी गावातील पाझर तलावात पडल्याने एक शेतमजूर बुडून बेपत्ता झाल्याची घटना काल घडली आहे. बीडसह गेवराई येथील अग्निशामक पथकाने बोटीच्या सहाय्याने शोध घेऊन देखील बेपत्ता मिळून आला नसल्याने रात्र झाल्यामुळे शोध कार्य थांबविण्यात आले होते. 53 वर्षीय बेपत्ता बिभिषण सुदाम लोंढे यांचा आज पुन्हा शोध घेतला जातोय.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्टला मुंबई जाण्यावर ठाम आहेत, पण 26 तारखे पर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्याचा विचार करावा असे म्हणाले आहेत, तसेच मराठा उपसमितीचा अध्यक्ष बदलणे म्हणजे नादी लावण्याचा खेळ आहे, फक्त खांदे पालट आहे, तसेच लक्ष्मण हाके जे म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, धनगर आणि मराठा समाजाचे काही भांडण नाही, आम्हाला विरोध करू नका, तुमचे आरक्षण वेगळे आहे.
उदय सामंत हे शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओक निवासस्थानी आले आहेत. भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, उदय सामंत यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एका दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून एका शेतात नेऊन बस चालकाने विद्यार्थीला धमकी देत बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र बस चालकाने बलात्कार केल्याचा पुरवणी जवाब पीडितेने दिल्याने या प्रकरणी पोलिसांनी संशयित 38 वर्षीय बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला अटक करून त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
धडकेत महिलेचा जागीच मृत्यू… ट्रक चालक पसार.. परिसरात संतापाचे वातावरण… रिंकू प्रदीप आरच (28) असे मयत झालेल्या महिलेचे नाव… सकाळी मुलाला शाळेत सोडल्यावर घरी परतत असताना कल्याण पश्चिम येथील निक्की नगर परिसरात मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने घडली घटना… याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू
उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, डॉक्टरांनी तपासणी केली… तब्येत खालावलेली असतानाही आंदोलनावर ठाम निर्धार… हरणबारी ते तळवाडे-भामेर कालव्याचे काम ४५ वर्षांपासून अपूर्ण… सिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायम… कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप… प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप.. मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार
क्रिकेटमध्ये भारत पाकला का शरण जातंय… या खेळ नसून पाकिस्तानी युद्ध आहे… भारत पाक सामन्यावर जास्त सट्टेबाजी गुजरातमध्ये होते… भारतीय क्रिकेटला काळिमा फासणारी घटना… भारत पाक सामन्यात लाखोंची उलाढाल… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेले असताना देखील जळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. गणपती विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती अद्यापही करण्यात आलेली नसून खड्डे तसेच असल्याचा पाहायला मिळत आहे.
गणेश मंडळांच्या आढावा बैठकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांना काळ फासण्याचा इशारा दिला होता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतरही विसर्जन मार्गावरील रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही
मालवणीतील टाउनशिप स्कूलमध्ये मंगल प्रभात लोढा यांच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचा निषेध. मालाडमधील मालवणी येथील टाउनशिप शाळेच्या खाजगीकरणावरून भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत.
टाउनशिप शाळेच्या खाजगीकरणाविरोधात माजी काँग्रेस नगरसेवकांसह कार्यकर्ते शाळेबाहेर जमले आहेत. काँग्रेसने खाजगीकरणाला विरोध केला आहे. ही शाळा गरीब मुलांसाठी बांधली गेली आहे, जर ती खाजगीकरण झाली तर गरीब मुले कुठे शिकतील असा सवाल त्यांनी विचारला आहे.
मनसे नेते अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होणार आहे. गेल्या महिन्याभरानंतर सुरू झालेल्या पावसामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या महिनाभरात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेती पिकांसोबत धरणातील पाणी पातळी चिंताजनक झाली होती.
कल्याण स्थानक परिसरात रिक्षाचालकांची मनमानी सुरू आहे. जवळच्या अंतरासाठी रिक्षाचालक भाडं नाकारतात, याप्रकरणी प्रवाशांनी रिक्षाचालकांविरोधाक तक्रार करूनही काहीच कारवाई नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात येणार असून पुणे शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची पुण्यात आज बैठक होत असून बैठकीला निमंत्रित पदाधिकारीच उपस्थित असतील. सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे बैठक बोलावली
नाशिक मध्ये आज मराठा संघटनांची बैठक होणार आहे. मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील संघटनांची आज बैठक होईल. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईकडे जाणार आहेत. नाशिक मधून देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.