
कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका उभारणीचं काम सुरू आहे. ही मार्गिका जलद मार्गिकेला जोडण्यासह अन्य यांत्रिक कामं आज, मंगळवारी मध्यरात्रीनंतर करण्यात येणार आहेत. यासाठी अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत मंगळवारी 93 लोकल फेऱ्या आणि बुधवारी 122, अशा एकूण 215 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी अप जलद मार्गावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर 12 ते बुधवारी पहाटे 5.30 आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्रीनंतर 1 ते पहाटे 4.30 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे पाचव्या मार्गिकेवरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. रद्द फेऱ्यांमध्ये बारा डब्यांसह १५ डबा आणि एसी लोकलचाही समावेश आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
मीरा- भाईंदरमध्ये निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच चांगलंच राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि भाजपची युती फिस्कटल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात एकमेकांविरोधात वक्तव्य सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुणे भयमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे.पुण्यात उद्योग भवन उभारण्यात येणार आहे. पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन करण्याची योजना आहे.पुण्यातील महानगरपालिकाचे हॉस्पिटल आहेत,तेथे आहेत पॅथॉलोजी लॅब उभारणार आहे असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
घराणेशाही संदर्भात आम्ही कुठेही नवीन उमेदवार दिले नाहीत. मात्र एक दोन ठिकाणी अपवाद झाले असतील कारण त्यांनी फॉर्म भरून टाकलेले होते असे दोनच ठिकाणी झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावर निशाणा साधला आहे. पिंपरीत गेल्या 9 वर्षात नियोजनशून्य कारभार झाला असा आरोप त्यांनी केला. पुणे, पिंपरीत राष्ट्रवादीचा महापौर असताना मेट्रोचं भूमीपूजन झालं होतं.
मनसेतून उमेदवारी नाकारल्यानंतर संतोष धुरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला आहे, असा आरोप संतोष धुरी यांनी केला आहे. संतोष धुरींनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. जागावाटपाच्या चर्चेपासून संदीप देशपांडेंना दूर ठेवल्याचा आरोपही धुरी यांनी केला. उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरल्याची टीकाही धुरी यांनी केली.
गँगस्टर अबू सालेमने आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आणि त्याच्या मोठ्या भावाचे अंतिम संस्कार करण्यासाठी पॅरोल मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार रॅलीला सुरूवात केली आह. पुढच्या पाच वर्षात जळगावचा विकास करणार असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांच्या सोबत गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांची उपस्थिती आहे.
देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणामध्ये सुरू होणार आहे. मंगळवारी हरियाणा सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ज्यामध्ये जिंद आणि सोनीपत दरम्यान हायड्रोजनवर चालणारी ट्रेन धावेल, तो अंतिम टप्प्यात आहे.
डोंबिवलीत भाजपच्या विरोधात उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या उमेदवाराने भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक 26 अ मध्ये भाजपचे मुकुंद पेडणेकर यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख राहुल बाळाराम भगत यांनी माघार घेतली होती. त्यामुळे पेडणेकर बिनविरोध विजयी झाले होते. आता राहुल भगत यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 800 रूपयांची तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 41 हजार 110 रुपये तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 53 हजार 380 रुपयांवर पोहोचला आहे.
शेतकरी पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाच्या खटल्यातून बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह आंदोलकांची निर्दोष मुक्तता झाली आहे. 2017 साली श्रीरामपूर पाटबंधारे कार्यालयात आंदोलनादरम्यान तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल कलण्यात आला होता. यावर श्रीरामपूर न्यायालयाने निकाल दिला आहे. बच्चु कडू यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
धुळ्यातील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. फक्त लाडकी बहीण योजना चालू ठेवायची नाही तर बहिणीला लखपती दिली करायचे आहे असंही फडणवीस म्हणाले.
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवडणूक आयोगाचं पथक तैनात करण्यात आले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक गाडीची कसून तपासणी सुरु झालेली आहे. मौल्यवान वस्तू, रोकड, दागिने आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
मला वाटतं रवींद्र चव्हाण यांच्या अंगात आले आहे त्याच्या पार्श्वभूमी वरती मी बोलणार नाही. ते काढलं तर फार जास्त होईल. विलासरावांचं नाव मिटवणे भाजप येईल किंवा रवींद्र चव्हाण येतील जातील विलासरावंच नाव मिटवण्याची ताकद या महाराष्ट्रात पुन्हा कुणाची झाली नाही असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
अजित पवार यांचे “मिशन पुणे महापालिका” सुरु झाले आहे. दुपारी २ वाजता पुण्यातील सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आज अजित पवार घेणार बैठक. तसेच सर्व प्रभागातील उमेदवारांची अजित पवार भेट घेणार. महापालिका निवडणुकीपूर्वी देणार उमेदवारांना कानमंत्र.
नाशिक जिल्ह्यात सन 2017 नंतर आता प्रथम मतदान होत आहे. 2017 मध्ये मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी तर सटाणा तालुक्यातील नवेगाव येथे झाले होते दारूबंदीसाठी मतदान. बाटली आडवी करण्यासाठी नांदूर्डी येथे बजवणार 4 हजार 406 मतदार मतदानाचा हक्क. संघ्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार मतमोजणी.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. छातीशी संबंधित स्पेशलिस्ट डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, प्रहारचे नेते बच्चु कडून श्रीरामपूर न्यायालयात दाखल झाले आहेत.2017 साली श्रीरामपूर पाटबंधारे कार्यालयातील तोडफोड प्रकरण दाखल गुन्ह्याची आज अंतिम सुनावणी सुरू आहे. शेतकरी पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलना संदर्भात कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिकाऱ्याच्या खुर्चीला काळे फासल्याप्रकरणी बच्चु कडू यांच्यावर गुन्हा दाखल होता.
मनसे नेते संतोष धुरी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी मनसेमध्ये येताच पहिला बॉम्ब टाकला. मनसे उद्धव ठाकरेंकडे सरेंडर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मातोश्रीच्या आदेशानंतर अनेक ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप संतोष धुरी यांनी केला आहे. पालिका निवडणुकीपूर्वी मनसेला हा मोठा धक्का बसला आहे.
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयामध्ये मनसे नेते अविनाश जाधव इच्छुक उमेदवार अर्ज बाद ज्यांचा झाला आहे तसेच इतर अपक्ष उमेदवारांची बाजू मांडली. निवडणूक आयोग यांना तक्रार केल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांना देखील मनसेच्या वतीने अनेक तक्रारीचे पत्र देण्यात आले.
या ठिकाणी आरोप करताना अनेक लोकांनी पातळी सोडली आहे. मी त्याच्यात जात नाही. आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही. आरोपाला उत्तर देण्यात आलं आहे. अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या आरोपावर भाजप आमदार महेश लांडगेंचा पलटवार करत अनेकांनी आरोप पातळी सोडल्याचा आरोप केला आहे.
15 तारखेची निवडणूक ही उमेदवारांच्या नशिबाची नाही तर केंद्राची आणि राज्याच्या 126 योजनांचे भविष्य ठरवणारी आहे.विकसित पिंपरी चिंचवड साठी विकासासाठी केवळ भाजप करू शकणार आहे.कुठलाच सैनिक माजी नसतो, सैनिकांच्या मनात आत्मसर्पणाची, या देशाला सर्वोत्तम करण्याची भावना तेवत असते, त्याचा आदर भाजपने केलाय. सैनिकांचे जे प्रश्न आहेत, त्याची मी दखल घेतली आहे. महसूल विभागात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कोविड कोणाला होतो जे प्रत्यक्षात मैदानात उतरतात दुसरं काही बोलायला शिल्लक नाही तर व्यक्तिगत बोलायचं का संजय राऊत यांनी त्यांची तब्येत त्यांनी तपासून घ्यावी असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. मर्यादा संजय राऊत विसरले आहे त्यांनी आराम करावा, त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते अशी वक्तव्य करत आहेत ज्यांनी कोविडमध्ये मुंबई लुटून खाल्ली ते खरे रहमान डकैत आहेत. एकनाथ शिंदेंनी ग्राऊंडवर उतरून काम केलं. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर निवडून आले पाहिजे विकासाच्या बाजूने महायुती आहे, असे केसरकर म्हणाले.
निवडणुक आयोग पारदर्शी निवडणुका होऊ देत नाही हे गेल्या काही निवडणुक मध्ये जाणवलं. बोगस मतदार वाढले याच वृत्तांकन माध्यमांनी केलं. मतदानाच्या 48 तास आधी प्रचार बंद होतो पण गेल्या निवडणुकीत सकाळी 7 वाजता मतदान असताना रात्री 10 पर्यन्त प्रचार करू दिला हे वादग्रस्त आहे.मतदारांना पैसे वाटता यावे यासाठी हा निर्णय घेतला. सत्ताधारी आणि निवडणूक आयोग यांनी तमाशा मांडला, पैसा फेक तमाशा देख अस चित्र निर्माण केलं.आता मनपा निवडणुकीत तोच कित्ता गिरविला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मी कुठल्याही पदाची लालसा केली नाही. कारसेवेत माझाही खारीचा वाटा असल्याचा अभिमान – सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना काल रात्री दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात काल रात्री दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. थंड हवामान आणि प्रदूषणामुळे त्यांचा अस्थमा वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
आज ठाण्यामध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, व शिवसेनेचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेना व भाजपच्या एकत्रित वचननाम्यावर चर्चा होणार आहे. भाजप व शिवसेनेचा एकत्रित वचननामा येणार आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत शिवसेना व भाजपाचा एकत्रित आणि शिवसेनेचा वेगळा वचननामा येणार यावर अंतिम निर्णय झाला. त्यासंबंधीच आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
आर्यन खानला लगेच अटक झाली. सातारा ड्र्ग्सप्रकरणी अनेक गोष्टी बाहेर आल्या नाही 115 कोटींचं ड्रग्स मिळालं तरी ओमकार डिगेला अद्याप अटक नाही. वारंवार ड्रग्स सापडत आहेत, फडणवीसांच्या कारवाईचं काय ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
मी विलासराव यांच्यावर कोणतीही टीका केलेली नाही. ते फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पण त्यांनाचा फोकस करून काँग्रेस मतदान मागतंय. त्यांचया चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो – रवींद्र चव्हाणांचे स्पष्टीकरण
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १० मधील शिवसेनेच्या उमेदवार इंदुबाई नागरे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार असूनही इंदुबाईंचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. आजही त्या पहाटे उठून आपल्या गोठ्यातील गायींना चारा घालणे, शेण साफ करणे आणि शेतातील खुरपणी अशी अंगमेहनतीची कामे उरकूनच प्रचाराला सुरुवात करतात. वयाला न जुमानता त्यांचा कष्टकरी स्वभाव, साधेपणा आणि मतदारांशी थेट नातं जोडण्याची पद्धत यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात त्यांची मोठी चर्चा रंगली आहे.
वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर ३० ते ४० वर्षांपूर्वी बांधलेले कोल्हापुरी बंधारे आता काळाच्या ओघात जीर्ण झाले आहेत. मसला पेन परिसरातील एका महत्त्वाच्या बंधाऱ्याची पडझड झाली आहे. या बंधाऱ्याच्या पाण्यावर शेकडो हेक्टर शेती अवलंबून असते, मात्र पडझडीमुळे पाणी साठवणूक होत नसल्याने सध्या अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे गहू, हरभरा यांसारखी रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर अवचार आणि देवानंद अवचार यांसारख्या स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई विकास आघाडी आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) यांचा समावेश असलेल्या या आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत मुंबईच्या विकासाचा मुख्य रोडमॅप असणारा ‘अधिकृत जाहीरनामा’ प्रसिद्ध केला जाणार असून, मुंबईकरांसाठी आघाडी नेमक्या कोणत्या घोषणा करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांचा मास्टर प्लॅन आता समोर आला आहे. या प्लॅननुसार, शिंदे सकाळी विविध जिल्ह्यांमध्ये झंझावाती प्रचार सभा घेणार असून, संध्याकाळी एम एम आर (MMR) रिजनमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये भव्य रॅली आणि सभांचे आयोजन करण्यात आले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आज एकनाथ शिंदे नवी मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. नवी मुंबईत होणाऱ्या या भव्य रोड शो आणि प्रचार रॅलीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, विशेषतः भाजप नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीच्या वतीने शहरात जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे. भाजपकडून ‘नमो भारत, नमो ठाणे’ असे घोषवाक्य असलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि कमळाचे चिन्ह झळकत आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह माझ्या भावाला मत, धनुष्यबाणाला आणि जगणं झालं छान, कारण धनुष्यबाण अशा भावनिक सादेचा आधार घेतला आहे. या हाय-व्होल्टेज प्रचारात ठाणे महापालिकेवर नक्की कोणाचा भगवा फडकणार आणि महापौर कोणाचा होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ऊदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धा तासापासून वर्षा निवासस्थानी बैठक सुरू आहे. ठाकरेंच्या दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहीती मिळत आहे. मुंबईत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सक्रीय होणार. महत्वाच्या नेत्यांवरही जबाबगदारी देण्यात येणार आहे.
भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी दोन आजरा नदीकिनारी वाजता सभा होणार आहे. मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे 5 हजार कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांवर टीका करतात की विकासावर बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.
माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी महापौर अशोक मुर्तडक आज शिवसेनेत प्रवेश करणार. खासदार हेमंत गोडसे यांच्या सोबत दोन्ही माजी महापौर मुंबईकडे रवाना झाले आहेत. दुपारी बारा वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे.
बिनविरोध ही सरळ मार्गानं नाही… हे स्पष्ट दिसतंय… निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे एजंट म्हणून काय करतंय… विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे इतरांचे अर्ज घेतले नाहीत… मोदी – शाह असेपर्यंत निवडणूक आयोग बरखास्त करा… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे शहर दौऱ्यावर आहेत. भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी दोन वाजता नदीकिनारी सभा होणार आहे. मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी तयारी पूर्ण झाली असून सुमारे 5 हजार कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवाजीनगर येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनला धर्मादायुक्तांकडून भाडेतत्त्वावर जागा देण्यास परवानगी दिली. ही जागा पार्थ पवार यांच्याशी संबंधित एका कंपनीने घेतली. तिथे इमारत बांधण्यात आले. त्यानंतर परवानगी नसताना विक्री केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान याबाबत डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सोहन शिरगावकर यांचे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
पुणे शहरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. वेगवेगळे बनाव करून सायबर चोर त्यांनी दोन नागरिकांच्या बँक खात्यातून 14 लाख 35 हजार रुपयांचे रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणांमध्ये नरे आणि चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे- महापालिका आरोग्य विभागाला शहरातील सोनोग्राफी केंद्राचे मासिक अहवाल वेळेत मिळावे त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. यामुळे नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांना तपासण्यासह सर्व माहिती मासिक अहवाल आता ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.
न शिकलेली बाई तिने हनुमान चालीसा अजून म्हणून दाखवली नाही- यशोमती ठाकूर यांची नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका. अमरावती-काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्या नवनीत राणावर टोला. न शिकलेली बाई राहुल गांधींना संविधान काय आहे विचारते. मात्र त्या बाईने अजून पर्यंत हनुमान चालीसा म्हणून दाखवली नाही असा टोला काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी लगावला..
मुंबईची हवा आज प्रचंड दूषित झाली असून शासकिय समीर अॅपनुसार मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२१ च्या घरात पोहोचलेला दाखवत आहे. मात्र इतर ठिकाणी तो २५६ चा घरात अती धोकादायक श्रेणीत दाखवत आहे. पीएम 2.5 चा प्रमाण १७१ इतकं आहे तर पीएम 10 चे प्रमाण २१८ वर पोहोचलं आहे. मुंबईची हवा ही धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे.
राज्यात अवयव दानात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी राज्यात एकूण 153 जणांचे मरण उत्तर अवयव दान झाले विशेष म्हणजे त्यातील एकूण 80 जण पुणे विभागातील असून त्यातून म्हणजे जात गरजू रुग्णांना यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. राज्यातील चारही विभागात पुण्यातील अवयवदानाची संख्या सर्वाधिक आहे.
बिनविरोध निवडणुकीची तरतूद कायद्यातच असून, निवडणुकीत एकच उमेदवार असल्यास त्यापुढे ‘नोटा’ हा पर्याय देऊन निवडणुका घेण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. ‘नोटा’चा पर्याय हा उमेदवार नसून, निवडणूक झाल्यास निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
सध्या राज्यभर महापालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचीच चर्चा आहे. त्यावरून राज्य निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यात येत आहे. आयोगाकडून या प्रक्रियेत हस्तक्षेप करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून मोठी गर्दी जमली आहे. हजारो भाविक पहाटेपासून दर्शनरांगेत उभे आहेत. भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
छत्रपती संभाजीनगर- जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील ६१४ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे, तर नव्याने अस्तित्वात आलेल्या १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रशासनाला अजूनपर्यंत कुठल्याही सूचना अथवा मार्गदर्शन प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रशासनही गोंधळले असून, ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकराज अवतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीला हरित लवादाने स्थगिती दिली आहे. कायदेशीर परवानगीशिवाय एकही झाड तोडू नये, असा अंतरिम आदेश लवादाने दिला आहे. समुद्री महामार्ग जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ब्रिटिशकालीन जुने वड तोडण्याचा प्रयत्न झाला आहे. व्हीटीसी फाटा ते एमएसजीबीटी महाविद्यालय मार्गावर वृक्षतोड झाली. पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी हरित लवादात तक्रार दाखल केली.
रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. शहरातील प्रभाग २२, २७ आणि २९ मधील शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या शिवाजीनगर येथील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्ता मेळावा प्रचार कार्यालयात पार पडणार आहे.
नव्या वर्षात वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेवरील राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस अतिरिक्त डब्यांसह धावत राहणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली तेजस राजधानी, मुंबई-अहमदाबाद शताब्दी आणि साबरमती राजधानी एक्स्प्रेसला प्रत्येकी एक अतिरिक्त डबा जोडण्यात आला आहे. वाढीव डब्यांसह ३१ जानेवारीपर्यंत राजधानी, शताब्दी धावणार आहेत.
गाडी क्रमांक १२९५१/५२ मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली तेजस राजधानीला एलएचबीचा एक तृतीय वातानुकूलित आणि गाडी क्रमांक १२९५७/५८ साबरमती-नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानीला एक तृतीय वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. अतिरिक्त डब्यांमुळे तेजस राजधानी २२ डब्यांसह आणि स्वर्णजयंती राजधानी २३ डब्यांसह धावणार आहे.