Maharashtra News LIVE : कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Maharashtra News LIVE Updates : राज्यावर पावसाचे मोठे संकट आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरूवात देखील झाली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.

राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचे मोठे संकट आहे. भारतीय हवामान विभागाने दोन दिवसांकरिता पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक भागात गारपिट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. या पावसामुळे शेती पिकांंचे नुकसान होत आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेकडून युद्धबंदी काही दिवसांकरिता जाहीर करण्यात आली. होर्मुज खाडीत अजूनही तणावाचे वातावरण आहे. भारताचे जहाज तिथे अडकले आहेत. बारामतीमध्ये काल बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीची सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराकरिता मोठी सभा झाली. भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा बघायला मिळत आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला
कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज राहाता सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणाचा कोर्टात तब्बल सव्वा तास युक्तिवाद सुरु होता. आरोपीच्या वतीने प्रशांत गिरी यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील व तपास अधिकाऱ्याने आरोपीच्या वकिलाचे मुद्दे खोडले. 31 मार्च पासून कल्पना खरात फरार असून आता तिला अटक करण्याचे आव्हान शिर्डी पोलिसांसमोर आहे.
-
एक वर्षानंतरही पहलगामच्या आरू व्हॅलीकडे पर्यटकांची पाठ
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्याचे पडसाद पर्यटन क्षेत्रात दिसून येत आहेत. विशेषतः प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आरू व्हॅलीकडे पर्यटकांनी काही प्रमाणात पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
-
-
महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी पाडले – रामदास आठवले
मोदी सरकारला फायदा होऊ नये यासाठी महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी संसदेत पाडले आहे. महिला आरक्षण बिलाला 54 मते मिळाली असती तर बिल पास झाले असते. आता या विरोधात रिपब्लिकन पक्ष ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
-
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने प्रेयसीकडून प्रियकराच्या पत्नीची हत्या, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने प्रेयसीकडून प्रियकराच्या पत्नीची हत्या
आरोपी शैला सोनार हिने केलेल्या चाकू हल्ल्यात साधना सोनपेटकर त्यांचा मृत्यू
एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून घटनास्थळावरून आरोपी महिलेला अटक
मृत महिलेच्या सासूसमोर चाकूने वार करून करण्यात आला खून
-
बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा
बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरी तुमरी
पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे कार्यकर्त्यांची पालिका आवारात घुसखोरी
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 7 मे रोजी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 7 मे रोजी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
आरोपी विष्णू चाटे याच्या वतीने कोर्टाकडे GPA साठी अर्ज
आजच्या सुनावणीसाठी आरोपींची व्हीसीद्वारे उपस्थिती.
धनंजय देशमुख यांचीही सुनावणीला उपस्थिती
-
लग्न जुळत नसल्याने बुलडाणा जिल्ह्यात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
लग्न जुळत नसल्याने बुलडाणा जिल्ह्यात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे हरीश वानखेडे यांची आत्महत्या
तर चिखली तालुक्यात मंगरूळ येथे सत्यपाल भिसे यांची आत्महत्या
लग्नासाठी अनेक मुली पहिल्या, मात्र लग्न झालं नाही
तणावामुळे दोन तरुणांची आत्महत्या
-
अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरण….
पोलिसांकडून आणखी एक जप्त मोबाईल, यांनी नोमान नावाच्या एका तरुणाला मोबाईल विकला होता तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला. त्यासाठी पोलिसांनी समरस पुरा पोलीस स्टेशन पासून ते नोमानच्या घरापर्यंत आरोपीची धिंड काढली. या मोबाईल मधून आणखी काही पुरावे मिळतात का हे देखील पोलीस तपासात समोर येणार आहे.
-
कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाची सुनावणी पूर्ण
कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून काही वेळात कोर्ट निर्णय देणार आहे. राहाता न्यायालयात सुनावणी झाली. शिर्डीत अशोक खरातसह पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 31 मार्चपासून कल्पना खरात फरार आहे. आज राहाता न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी सुनावणी झाली. सरकारी वकील, आरोपीच्या वकिलासह फिर्यादीच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन गोडाऊनवर छापे, दोन टन सिंगल यूज प्लास्टिक जप्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन गोडाऊनवर छापे टाकण्यात आले असून. दोन टन सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मोती कारंजा परिसरात कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने तीनही गोडाऊनला प्रत्येकी 25 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.
-
मुबलक पाणी साठा शिल्लक तरीही उमरगा तालुक्यातील पेटसांगावी गावात पाणी टंचाई
धाराशिव जिल्यात मुबलक पाणी साठा शिल्लक असला तरी ही उमरगा तालुक्यातील पेटसांगावी गावात भीषण पाणी टंचाईचं संकट उभं राहीलं आहे. गावातील नळावर व पाण्याच्या टँकरला महिला व लहान मुले घागरी घेऊन भर उन्हात पाण्यासाठी रांगा लावत आहेत. गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना नसल्याने गावकऱ्यांची मोठी परवड होत असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे.
-
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व चार आरोपींना मोठा दिलासा
२००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व चार आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मालेगाव स्फोट प्रकरणातील चार आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द केला.
-
अमरावती प्रकरणातील आरोपीने विकलेला मोबाईल जप्त
अमरावतीच्या परतवाडा मध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांकडून आणखी एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने नोमान नावाच्या एका तरुणाला मोबाईल विकला होता तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
-
शासकीय कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच
जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच आहे. राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील 12 हजार शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
-
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीची पोलिसांनी काढली धिंड
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी आयानची धिंड काढली आहे.
-
ऑपरेशन टायगरची चर्चा दोन वर्षापासून – अंबादास दानवे
अंबादास दानवेंकडून ऑपरेशन टायगर चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न. “ऑपरेशन टायगरची चर्चा दोन वर्षापासून सुरू आहे. विधानसभा, लोकसभा झाल्या की ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु झाली. परंतु ह्या गोष्टी बोलाचीच कढी, बोलाचा भात आहे. नाव घेण्याला कोणाच्या तोंडावर हात ठेवू शकत नाहीत” असं अंबादास दानवे म्हणाले.
-
कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू
कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू. शिर्डीत दाखल गुन्ह्यात कल्पना खरात फरार. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात सुनावणी. राहाता सत्र न्यायालयात सुनावणी. फिर्यादीसह आरोपी आणि सरकारी पक्षाचे वकील न्यायालयात हजर. तिन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू. कल्पना खरातला जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष.
-
अजित पवार यांचा अपघात नसून घात – रुपाली ठोंबरे पाटील
दिवंगत नेते अजित पवार यांचा अपघात नसून घात आहे असं अनेकांना वाटते. या संदर्भात सातत्याने प्रश्नही विचारले जातात. सुनेत्रा पवार यांनी योग्य आणि पारदर्शक तपास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे निवेदन दिले आहे. संपूर्ण बारामतीला प्रश्न आहे दादांचा अपघात होऊ शकत नाही हा घातपात आहे. महाराष्ट्राच्या मनात जी शंका आहेत तीच शंका सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.
-
शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला
धाराशिवच्या भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे शेतकरी अभिमान ढगे या 60 वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्यावर तिघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमीन व्यवहाराच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, ढगे यांनी जमीन विक्रीस नकार दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
-
भाजप नगरसेविकेच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकले; मात्र बॅनरवर वरिष्ठांचे फोटो गायब
मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक १६च्या नगरसेविका श्वेता कोरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात बॅनर झळकू लागले. मात्र या बॅनरवर वरिष्ठ नेत्यांचे फोटो नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वगळता इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्यांचे छायाचित्र लावण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांचे फोटो असणे अपेक्षित असताना ते दिसत नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
-
धुळ्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
धुळ्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. शिरपूर तालुक्यातील आरती हॉटेलजवळ रिक्षाला आयशर वाहनाने चिरडलं. अपघातात महिलासह युवकाचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. धुळ्याहून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या भरधाव आयशरने रिक्षाला चिरडलं. जखमींना उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
-
नाशिकच्या TCS प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
नाशिकच्या TCS प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. TCS प्रकरणातील नाशिकच्याजवळ आली पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. संशयित आरोपी दानिश एजाज शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करत असताना झालेल्या वादातून फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला. तर सरकारी वकील ॲड किरण बेंडभर यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपीला जामीन देऊ नये यासाठी बाजू मांडली.
-
बेस्ट प्रशासनाकडून 500 मिडी बसेस खरेदीसाठी मंजुरी
बेस्ट प्रशासनाकडून 500 मिडी बसेस खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई मेट्रोला समांतर बससेवेचं जाळं निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
-
ठाण्यात सर्व्हिसींग सेंटर्सवर वाहनं धुण्यास 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात सर्व्हिसींग सेंटर्सवर वाहनं धुण्यास 10 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ठाणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
-
नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट
नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे. प्रति क्विंटल दोन ते तीन हजार रुपयांनी भाव पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. हळदीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अखेर लिलाव बंद पाडला आहे. जोपर्यंत योग्य दर मिळणार नाही, तोपर्यंत लिलाव सुरु होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
-
पहलगाममधील पर्यटन वाढवणं गरजेचं, तिथली बेरोजगारी वाढली आहे- संजय शिरसाट
“पहलगाम हल्ल्याविषयी लोकांच्या मनात अजूनही राग आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहलगामला पाठवलंय, तिथली परिस्थिती पाहता आजही आम्हाला इथे उदासिनता दिसून येते. ज्या व्हॅली बंद केल्या आहेत, तिथे बेरोजगारी वाढली आहे. सरकारने उपययोजना केल्या पाहिजेत. पहलगाम हे पर्यटनस्थळ घोषित केलं पाहिजे. पर्यटकांनी इथं येणं गरजेचं आहे. ज्या आदिलने 26 लोकांचे प्राण वाचवले, त्याच्यासाठी आम्ही इथे आलोय”, असं संजय शिरसाट म्हणाले.
-
पहलगाममध्ये आर्मीचा कडेकोट पहारा; श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथक दाखल
कश्मीरमधील पहलगाम परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आर्मी आणि सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अलीकडील संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथक दाखल करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी सखोल तपासणी सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांकडून पर्यटकांची व स्थानिकांची ओळख तपासणी काटेकोरपणे केली जात आहे.
-
जळगावच्या जिल्ह्यात शेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवं संकट
जळगावच्या जिल्ह्यात शेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहीलं आहे. जळगावच्या ग्रामीण भागात मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी कुटुंबाला स्वतः शेतात कामे करत राबण्याची वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला शेतीकामासाठी मध्य प्रदेश सह इतर राज्यांमधील मजूर मागवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. मजूर मिळत नसल्याने कुटुंबातील उच्चशिक्षित मुलं देखील शेतीकामासाठी आई-वडिलांना मदत करत असल्याचे चित्र दिसतंय.
-
भोंदू राजेंद्र गडगे आणखी अडचणीत येण्याची शक्यता..
संगमनेर / अहिल्यानगर – भोंदू राजेंद्र गडगे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याच्यावर PCPNDT कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार. जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरकडून संगमनेर ग्रामीण रुग्णालयाला पत्र पाठवण्यात आलं आहे. राजेंद्र गडगे याच्याविरोधात PCPNDT कायद्यांतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मुलगा होण्यासाठी औषधोपचार देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
-
पुणे – सातारा रस्त्यावर रिक्षा चालकाची मुजोरी, भर रस्त्यात तमाशा
पुणे – सातारा रस्त्यावर रिक्षा चालकाची मुजोरी पहायला मिळाली. एसटी चालकाला शिवीगाळ केली. बीआरटी मार्गात अचानकपणे रिक्षा घातल्याने एसटी बसचा रिक्षाला धक्का लागला. त्यानंतर चालकाने रिक्षा रस्त्यात उभी करून वाद घातला. पुणे सातारा मार्गावर ट्राफिक जाम, वाहन चालकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
-
पुण्यात ३ महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात, लोकं संतापले
पुण्यातील गोखलेनगर परिसरातील जनता वसाहत येथे गेल्या ३ महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. ड्रेनेजचे घाण पाणी घरासमोर तर पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर पाणी लोकांच्या घरात घुसत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहेे.
-
जळगावात शेअर मार्केटच्या नावाखाली लाकूड व्यापाऱ्याला ३९ लाखांचा गंडा
जळगाव: शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष दाखवून जळगाव येथील ६२ वर्षीय लाकूड व्यापारी समीर नटवरलाल शहा यांची ३९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांनी शहा यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला त्यांना ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर १० हजार रुपयांचा परतावा दिला. या नफ्यामुळे चोरट्यांवर विश्वास ठेवून शहा यांनी मोठी रक्कम गुंतवली, मात्र परतावा मिळण्याऐवजी त्यांची एकूण ३९ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-
टिटवाळा ड्रग्ज प्रकरण: बार गर्लचा मुखवटा आणि कचऱ्याच्या डब्यात ६ कोटींचे ड्रग्ज; अश्विनी पॉलच्या कारनाम्याचा पर्दाफाश
टिटवाळा येथील पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये अमली पदार्थ विरोधी पथक (ANC) आणि कल्याण ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत ६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉल हिची दुहेरी ओळख समोर आली आहे. पालिकेचे अधिकारी असल्याचे सांगत सर्वेच्या बहाण्याने पोलिसांनी अश्विनीच्या घरात प्रवेश केला होता. सुरुवातीला घरात काहीच न सापडल्याने पोलीस रिकाम्या हाती परतणार असे वाटत असतानाच, एका कचऱ्याच्या डब्याने या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. या डब्यात ६ कोटींचे ड्रग्ज लपवून ठेवण्यात आले होते. तपासात धक्कादायक बाब म्हणजे अश्विनी ही ‘रुकसाना शेख’ या नावाने बनावट कागदपत्रे वापरत असल्याचेही उघड झाले आहे.
-
सोलापूर काँग्रेसला मोठं खिंडार? सुशीलकुमार शिंदेंचे निकटवर्ती पालकमंत्र्यांच्या गाडीत; राजकीय चर्चांना उधाण
सोलापूर: सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे अमोल बंगाळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी शिंदेंचे सावलीसारखे सोबती असणारे बंगाळे चक्क पालकमंत्र्यांच्या गाडीतून प्रवास करताना दिसल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अमोल बंगाळे यांनी यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली होती, तसेच त्यांच्या मातोश्रींनी नुकतीच काँग्रेसकडून महापालिका निवडणूकही लढवली होती. अशा परिस्थितीत बंगाळे यांची पालकमंत्र्यांशी वाढलेली ही जवळीक काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेदरम्यान घडलेल्या या प्रवासामुळे बंगाळे लवकरच भाजपचा झेंडा हाती धरतील, अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.
-
बीडमध्ये गारपिटीचा कांद्याला मोठा फटका; शेतातच पीक सडले, एकरी ५० हजार मदतीची मागणी
बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या या पट्ट्यात गारपिटीमुळे कांदा शेतातच सडून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. एकीकडे बाजारभावाअभावी कांदा कवडीमोलाने विकला जात असतानाच, आता अस्मानी संकटामुळे उभ्या पिकाची नासाडी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत आणि एकरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
-
नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता
नाशिक शहरात भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून, धरणांमध्ये केवळ १० दिवसांचा पाणीसाठा शिल्लक राहिल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. ३१ ऑगस्टपर्यंतचा काळ लक्षात घेता २० दिवसांची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाने महापालिकेला अलर्ट दिला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी शहरात १५ टक्के पाणी कपात करणे आवश्यक असून, उपाययोजना म्हणून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. उर्वरित सहा दिवस नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात असून, या गंभीर प्रश्नावर महापालिका आयुक्त मनिषा खत्री आणि लोकप्रतिनिधींची लवकरच संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच पाणीकपातीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.
-
सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरचा कायापालट; २५ एप्रिलला भूमिपूजन
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, त्र्यंबकेश्वर येथील बहुप्रतिक्षित २४९ कोटी रुपयांच्या दर्शनपथ प्रकल्पाचे भूमिपूजन २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे त्र्यंबकेश्वरच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत देवस्थान परिसरातील अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवून परिसर मोकळा केला आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्र्यंबकेश्वर ते माहेश्वर अशी भव्य ‘गोदावरी-नर्मदा जलयात्रा’ देखील मार्गस्थ होणार आहे. जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या जलदिंडीमुळे धार्मिक आणि सामाजिक पर्यावरणाचा जागर होणार असून, त्र्यंबकेश्वर नगरी लवकरच एका नव्या रूपात भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.
-
टीसीएस प्रकरणात पीडितेचा धक्कादायक खुलासा
धार्मिक कट्टरता आणि वैयक्तिक आयुष्यावर अश्लील शेरेबाजीचे आरोप. प्रशिक्षण काळातच संशयितांकडून मानसिक छळ सुरू असल्याचा दावा. ऑफिसमध्ये नवीन तरुणींना ‘प्लेअर’ म्हणून हिणवल्याचे आरोप. अश्लील प्रश्न, हावभाव आणि जवळीक साधण्याचे प्रयत्न. धर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य करत भावना दुखावल्याचा आरोप. पीडितेचा पाठलाग करून बाहेर भेटण्यास दबाव टाकल्याची तक्रार. जून 2025 ते मार्च 2026 दरम्यान सतत छळ सहन केल्याचा दावा. कार्यस्थळी सुरक्षेवर आणि POSH कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
-
परतवाडा लैंगिक शोषण व मुलींचे व्हिडिओ व्हायरल प्रकरण
बयान अहमद सह चार आरोपींची सात दिवसाची पोलीस कोठडी. 27 एप्रिल पर्यंत सर्व आरोपी राहणार पोलीस कोठडीत. अयान ने रिल बनवण्यासाठी वापरलेली थार गाडी व नोटांचे बंडल, आयफोन रिवाल्वर याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे मत. मुलींचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करून त्यातून आरोपींनी पैसा कमावला का? आठ आरोपींचे 11 खात्यांचे बँक स्टेटमेंट पोलिसां जवळ, या बँक खात्यामध्ये आलेल्या पैशाची कसून चौकशी करणे.
-
एसआयटी चौकशीदरम्यान भोंदू अशोक खरात याची प्रकृती बिघडल्याची माहिती
तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स मागवून करण्यात आली भोंदू अशोक खरात याच्या प्रकृतीची तपासणी. खरातला डोकेदुखी , मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याची माहिती. छातीत दुखत असल्याने काही काळ लावण्यात आला होता ऑक्सिजन.
-
टीसीएस प्रकरणात सहा संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल. 2 तारखेला होणार जमीन अर्जावर सुनावणी. यापूर्वी संशयित निदा खानच्या वतीने देखील करण्यात आला होता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. मात्र न्यायालयाने सुनावणी 27 तारखेपर्यत पुढे ढकलली. आता इतर अटकेत असलेल्या 6 संशयित आरोपीच्या वतीने देखील जामिनीसाठी अर्ज दाखल. दानिश शेख, आसिफ अन्सारी,तौसिफ अत्तार,शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि शफी शेख या संशयित आरोपींकडून जामिनासाठी अर्ज
-
मोठी बातमी! एक्स्प्रेसवरील वाहतूक तात्पुरती बंद…
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर डोंगरगाव कुसगाव येथे पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल ला दुपारी बारा ते तीन या वेळेत पूर्णपणे बंद राहील या कालावधीत सर्व वाहने किवळे देहू रोड तळेगाव मार्गे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून कुसगाव टोल प्लाजा कडे वळविण्यात येणार आहे पुण्याकडे येणारी वाहतूक 24 एप्रिलला दुपारी बारा ते तीन या वेळेत बंद राहील या दरम्यान सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून देहूरोड किवळे मार्गे पुण्याकडे वळवण्यात येतील वाहन चालकांनी प्रवाशाचे योग्य नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
-
धाराशिवमध्ये वीज पडून 55 वर्षे शेतकऱ्याचा मृत्यू
अवकाळी पावसात वीज पडून धाराशिवच्या विठ्ठलवाडी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आठ दिवसानंतर ज्या घरात लग्न सोहळा होता त्या घरात आज दुःखाचा डोंगर आहे. बबन लांडगे असे या शेतकऱ्याच नाव असून शेतात कडब्याची गंज रचायला गेलेले लांडगे यांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलं व एक मुलगी असा परिवार आहे एकुलत्या एक मुलीचं पुढील आठवड्यात लग्न होत. लग्नाची तयारी ही पूर्ण झाली होती मात्र त्या अगोदरच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
राज्यात 24 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचा इशारा
राज्यात 24 एप्रिलपर्यंत विजांसह वादळी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात तापमान 45 अंशांवर पोहोचले आहे. उकाड्याच्या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस व गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.