
गोंदिया : लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात झाला आहे. सगळे वराती बसमध्ये साखर झोपेत असताना अपघात झाला. अपघातात एकाच्या मृत्यू तर 9 लोक गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. तर चालक बस सोडून पसार झालाय..
अमरावतीमध्ये भारत गॅस कंपनी कडून घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र व्हाट्सअप वर बुकिंग करणे किचकट असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास होत आहे. सिलेंडरसाठी ग्राहक एजन्सीमध्ये पोहचले आहेत.
नाशिकमधील छोट्या हॉटेल व्यावसायिकांवर गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे उपासमारीची वेळ आली असून, अनेकांकडे केवळ ४ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. नवीन सिलेंडरसाठी प्रचंड वेटिंग असल्याने व्यावसायिक हवालदिल झाले असून, नातेवाईक आणि मित्रांकडून सिलेंडरची जुळवाजुळव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. गॅसअभावी व्यवसाय कसा चालवायचा, या संभ्रमात असलेल्या या छोट्या व्यावसायिकांनी शासनाकडे गॅस पुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी केली आहे, अन्यथा शेकडो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सोलापूरमधील अनेक सुप्रसिद्ध हॉटेल्सकडे व्यावसायिक गॅसचा केवळ एक दिवसाचा साठा शिल्लक असल्याने हॉटेल मालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅसअभावी आता चूल पेटवून स्वयंपाक करण्याचा पर्याय निवडावा लागत आहे. यामुळे व्यवसायावर आणि पर्यायाने रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. हॉटेल बंद झाल्यास कामगारांच्या उपासमारीचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगत हॉटेल व्यावसायिकांनी सरकारला विनंती केली आहे की, व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद न करता, दररोज किमान २ ते ३ सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून बेरोजगारीचे संकट टळेल.
ठाणे रेल्वे स्थानकालगत असलेल्या कोपरी परिसरातील प्रसिद्ध ‘शिवम हॉटेल’ गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे पूर्णतः बंद करण्यात आले आहे. गॅसअभावी हॉटेलमधील चहा, पोहे आणि नियमित जेवण बनवणे अशक्य झाल्याने ग्राहकांना केवळ इलेक्ट्रिक शेगडीवर तयार होणारे सँडविच आणि पिझ्झा यांसारख्या पदार्थांवर समाधान मानावे लागत आहे. हॉटेलचे कामकाज ठप्प झाल्याने येथील कामगारांनी आता आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
आंबरनाथ MIDC मधील ज्या केमिकल कंपनीत दोन दिवसांपूर्वी भीषण स्फोट झाला होता, त्या कंपनीला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रात्री एक वाजता अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांना घटनेबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याचे समोर आल्याने सामंत यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. या पार्श्वभूमीवर, त्यांनी सर्व केमिकल कंपन्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ आणि ‘फायर ऑडिट’ झाले आहेत की नाही, याची कसून तपासणी करण्याचे कडक आदेश दिले आहेत. ज्या कंपन्यांचे ऑडिट प्रलंबित असेल, त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जळगाव जिल्ह्यातील घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. सध्या भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांकडे जिल्ह्यात पुढील १५ दिवस पुरेल इतका घरगुती गॅस सिलेंडर्सचा साठा उपलब्ध आहे. मात्र, दुसरीकडे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण तूर्तास थांबवण्यात आले असून, त्यावर योग्य ती कार्यवाही प्रलंबित आहे. गॅसचा काळाबाजार आणि जादा दराने होणारी विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कडक कारवाई केली जात आहे.
अमरावती शहरात मालमत्ता कराची तब्बल ८४ कोटी रुपयांची थकबाकी साचल्याने महानगरपालिका आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या कडक आदेशानंतर वसुली मोहिमेला वेग आला असून, १ लाख रुपयांपेक्षा जास्त कर प्रलंबित असलेल्या ९६७ मालमत्ता प्रशासनाच्या रडारवर आहेत. या मोहिमेअंतर्गत महापालिकेने गुरुवारी मोठी कारवाई करत हॉटेल, दुग्धसंस्था आणि कमर्शियल हॉलसह ४ मालमत्ता सील केल्या आहेत. यामध्ये ७ लाख रुपयांचा कर थकीत असलेल्या हॉटेल लॉर्डवर करण्यात आलेल्या कारवाईने मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या इतर मालमत्तांवरही आता जप्तीची टांगती तलवार असल्याने मालमत्ता धारकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अमेरिका–इस्रायल–इराण युद्धमुळे गॅस सिलेंडर पुरवठ्यावर परिणामगॅस मिळत नसल्याने गृहिणींचा इलेक्ट्रिक शेगड्यांकडे वाढता कल. कल्याण डोंबिवली परिसरात दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी खरेदीसाठी गर्दी
मेट्रोचे महासंचालक श्रावण हर्डीकर हे होते पिंपरी चिंचवड महापालिकेचे सध्या प्रभारी आयुक्त. मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिकेला विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पूर्णवेळ आयुक्त मिळाला
ठाणे महापालिकेचे १८ मार्चला होणाऱ्या दुसऱ्या महासभेत मागील तीन वर्षातील कामांचे प्रस्ताव स्थायी समिती गठित न झाल्याने अवलोकनार्थ ठेवण्यात आले आहेत. त्यात तब्बल 171 विषयांचे समावेश असल्याची माहिती समोर आली आहे..मागे महासभेत गदारोळ झाला होता दहा मिनिटांमध्ये पटवारी सर्वच विषय मंजूर करण्यात आले होते..
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानच थेट विधानभवनाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ईमेल करून ही धमकी देण्यात आली.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. आता पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
विधान भवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून याच काळात अशी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ही धमकी नेमकी कोणी, का दिली, याचा तपास केला जात आहे.
वसई विरारमधील एलपीजी गॅस तुटवड्याबाबत हॉटेल व्यवसायिकांनी तहसीलदारांची भेट घेतली. अमेरिका इराण युद्धाचा फटका वसई विरार मधील एलपीजी गॅस वितारणावर बसला असून, एलपीजी गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक चिंतेत आहेत.
वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी गॅस वितारकांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी मार्फत तोडगा काढण्याचे आश्वासन दिलं. वसई तालुक्यातील सर्व हॉटेल व्यवसायिकांची आज दुपारी पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांच्यासमोर बैठक होणार आहे.
गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनिक कडक पावले उचलले आहेत. जिल्ह्यातील गॅस एजन्सीवर लक्ष ठेवण्यासाठी शिधावाटप विभागाकडून 72निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. काळाबाजार झाल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून दोषींवर तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते.
धाराशिव मध्ये 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला, घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात पुरवठा विभागाकडून निरीक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत.
धाराशिव जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. धाराशिव मधील 200 हॉटेल्सचा व्यावसायिक गॅस पुरवठा थांबवण्यात आला असून घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण मात्र नियमित सुरू ठेवण्यात आले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठे ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीत युद्धाचे पडसाद उमटत आहेत.या औद्योगिक वसाहती मधील अनेक कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद झाल्याने सुमारे 30 टक्के कंपन्याचे कामकाज ठप्प झाले आहे. तर ऑनलाईन गॅस असल्याने उर्वरित 70 टक्के कंपन्याचे सध्या तरी कामकाज सुरळीत सुरू आहे
सोलापुरात छोटे हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल बंद ठेवायला सुरुवात झाली आहे. गॅस अभावी सोलापुरातील छोट्या व्यावसायिकांनी हॉटेल बंद केलं आहे. अनेक हॉटेल्समध्ये फक्त एक ते दोन दिवसांचा गॅस शिल्लक राहिला आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन दिवसांनी गॅस संपल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न भेडसावत आहे असे सांगत सरकारने याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती व्यावसायिकांनी केली आहे.
अमेरिका–इस्रायल–इराण युद्धामुळे मुळे निर्यात ठप्प झाल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमालाची विक्रमी आवक झाली आहे. शेतमाल मोठ्या प्रमाणात आल्याने भाजी फळे फुलांचा भाव घसरला असून ग्राहक नसल्याने बाजारातच शेतमाल पडून आहे, तो सडण्याची वेळ शेतकरी-व्यापारी चिंतेत आहेत. नाशिकमध्ये आजपासून ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन चे आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, एआय दालन, जुगाड ते तंत्रज्ञान स्पर्धा आणि परिसंवादांचे आयोजन यामध्ये करण्यात आलंय. कृषी उद्योग व बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने 12 ते 16 मार्च या कालावधीत ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन पार पडेल. बुलढाणा जिल्ह्यात मुली सह विवाहित महिला अचानक बेपत्ता होण्याचा सत्र थांबता थांबत नाहीये. बुलढाणा जिल्ह्यातून सरासरी दररोज पाच ते सहा मुली किंवा विवाहित महिला बेपत्ता होत आहेत. काल गेलेल्या 24 तासात जिल्ह्यातून एका विवाहितेसह पाच मुली व एक युवक असे सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.