महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नाना पटोले यांची मागणी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तत्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबई : ‘शिवतांडव स्तोत्र’ गायल्यामुळे संपूर्ण देशात चर्चेचं कारण बनलेले कालीचरण महाराज आता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधींवर अर्वाच्च शब्दात भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. काँग्रेसनेदेखील हा मुद्दा लावून धरला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तत्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरत शिवीगाळ केली
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कालिचरण नावाचा बाबा जो अकोल्याचा रहिवाशी आहे, त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरत शिवीगाळ केली. तर दुसरीकडे गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. महात्मा गांधींना शिव्या घालण्याचे पाप कालीचरण बाबाने केले आहे. या बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तात्काळ कडक करावी.
राष्ट्रपिता महात्मा गांधींना जगभरातील अनेक देश आदर्श मानतात
तसेच, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार जगभरातील अनेक देश आदर्श मानतात व त्यानुसार वाटचालही करतात. परंतु आपल्याच देशातील काही लोक जाणीवपूर्णक त्यांच्याबद्दल अपप्रचार करतात. त्यांच्याबदद्ल अर्वाच्च भाषा वापरतात हे निंदनिय आहे, असेदेखील नाना पटोले म्हणाले.
नेमके काय म्हणालेत कालीचरण महाराज?
कालीचरण महाराजांनी जे शब्द महात्मा गांधींबद्दल वापरलेत ते तर देशाच्या शत्रुबद्दलही सुसंस्कृत माणसं वापरणार नाहीत. मोहनदास करमचंद गांधी हे तर राष्ट्रपिता. महात्मा. जगभरात भारताची ओळख आहे आणि झाली ती याच महात्म्याच्या कृतीनं. त्याच महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिलीय. त्यातले काही शब्द तर इथे लिहिलेही जाऊ शकत नाही.कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचं आयोजन केलं जातंय. त्यातली छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली, त्यात कालीचरण महाराजानं हे तारे तोडलेत. काँग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केलीय.
इतर बातम्या :