Weather update : आणखी मुसळधार पाऊस होणार, राज्यासाठी ताजा हवामान अंदाज आला, तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार?

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह कोकण आणि पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.

Weather update : आणखी मुसळधार पाऊस होणार, राज्यासाठी ताजा हवामान अंदाज आला, तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार?
weather update today
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2026 | 9:03 PM

Maharashtra Rain Update : सध्या राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, कोकण, पुणे ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे तर मुंबईची दाणादाण उडाली आहे. मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर कुठे पाणी साचलेले आहे. ठाणे, कल्याण, पनवेल, रायगडमध्येही तुफान पाऊस आहे. हीच बाब लक्षात घेता कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, पालघर येथे शाळांनास सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या पावसामुळे सगळीकडे तारांबळ उडालेली असताना पुढच्या काही दिवसांचा ताजा हवामान अंदाज समोर आला आहे. पुढच्या दोन दिवसात आणखी तुफान पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसाचा जोर चांगलाच वाढणार

हवामान तज्ज्ञ, डॉ रामचंद्र साबळे यांनी 5 आणि 6 जुलै रोजी वातावरण कसे असेल, पावसाची स्थिती काय असेल, याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हवेचा दाब कमी होत असल्याने उद्या आणि परवा पावसाचं प्रमाण आणखी वाढणार आहे, कोकण किनारपट्टी, मुंबई या भागात शंभर ते दीडशे किंवा त्यापेक्षाही जास्त मिलिमीटर पाऊस पडणार आहे. पुण्यामध्येही 50 ते 60 मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह कोकण आणि पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. आगामी दिवसात मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. सध्या नैऋत्य मान्सून नुकतेच सक्रिय झाले आहेत. त्याचा फायदा मराठवाड्याला होईल, असेही डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.

मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे

दरम्यान, पुढच्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईकरांनीही गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us