मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, पुढील 5 दिवस धो धो पाऊस; IMD चा अंदाज काय?
महाराष्ट्रात जोरदार मान्सून आगमन झाले आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवसातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी महामार्गांवर वाहतूक व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आता पूर्णपणे मान्सून सक्रीय झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या सर्वदूर मान्सूनचा पाऊस पडत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. साधारणपणे १५ ते १६ जून दरम्यान मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्र व्यापतात. यंदा अंदाजित वेळेनुसारच मौसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. तसेच मौसमी पावसाने बहुतांश गुजरात व्यापला. याचबरोबर झारखंड आणि बिहारपर्यंत मजल मारली आहे. राज्यात सर्वदूर पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण आहे. पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे राज्यभरात पावसाचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. कालपासून म्हणजेच गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज काही ठिकाणी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी, अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील काही भागांत जनजीवनावर परिणाम
गेल्या २४ तासांत (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक ८३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे (७३.७ मिमी), मुंबई शहर (६२.९ मिमी), रायगड (५४.१ मिमी) आणि पालघर (४९.७ मिमी) जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील काही भागांत जनजीवनावर परिणाम झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर भेगा पडल्याने वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. तर सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
दरम्याने मान्सूनने महाराष्ट्रात दमदार एंट्री केली असून, पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
