
“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं काम सिंधुदुर्गाच्या जनतेने केलय. रवींद्र चव्हाण यांनी जे मार्गदर्शन केलं, पाठिंबा दिला, त्यामुळे सांघिक काम चांगल्या पद्धतीने करु शकलो. सिंधुदुर्गाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याची संधी चालून आलेली आहे. आज केंद्रात आणि राज्यात भाजप, एनडीए, महायुतीचं सरकार आहे. सत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आम्ही जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या माध्यमातून करु” असं मंत्री, आमदार नितेश राणे म्हणाले. “राणे साहेबांनी आमच्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न साडेचार लाखापर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प बोलून दाखवलेला. जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील सत्ता केंद्राचा वापर करुन ते साध्य करण्याचा प्रयत्न करु” असं नितेश राणे म्हणाले.
“निवडून आलेले जे पाच अपक्ष आहेत, तसं म्हटलं तर भाजप बंडखोर म्हणून त्यांचा उल्लेख करु शकतो. मला प्रामाणिकपणे वाटतं, या जिल्ह्यात भाजपला, महायुतीला हरवण्याची ताकद इथे ना उबाठामध्ये आहे, ना महाविकास आघाडीत आहे” असं नितेश राणे म्हणाले.
तो निश्चित महायुतीला गालबोट लावणारा आहे
“महायुती म्हणून सांघिक लढलो. अपक्ष आणण्याचा जो प्रकार झाला, तो निश्चित महायुतीला गालबोट लावणारा आहे. हे अपक्ष सावंतवाडी येथे आले आहेत. त्यांनी रवी चव्हाण यांच्या नावाचा वापर करुन त्यांचा पाठिंबा आहे असं सांगून ते भाजपचं अधिकृत कमळ चिन्ह पाडून आलेले आहेत. हे निश्चित रवी चव्हाण व आम्हाला मान्य नसेल” असं नितेश राणे म्हणाले.
अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय
“देवेंद्र फडणवीस, राणे साहेब, रवी चव्हाण व एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने महायुतीचा निर्णय झाला. पण तरीही एकाबाजूला शर्टावर कमळ चिन्ह लावायचं आणि दुसरीकडे कमळ चिन्हाचे उमेदवार पाडण्यासाठी ताकद लावायची. त्यांनी ताकद लावली असती तर महायुतीचा एकतर्फी विजय झाला असता. मी तर बोलतो 50 चे 50 उमेदवार निवडून आणण्यासाठी चांगली, सकारात्मक स्थिती सिंधुदुर्गात होती. हे मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हातांनी सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे हे जे लोक आहेत, अदृष्य हातांच्या नावाने भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.