उन्हाचा तडाखा वाढला, महिलेचा मृत्यू, भंडारा, वर्धा जिल्ह्यात तडकाफडकी मोठा निर्णय, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या गोंदियावासीयांना तात्पुरता दिलासा मिळाला होता.

Maharashtra Weather Update : दिवसेंदिवस पारा वर जाताना दिसतोय. उन्हाच्या झळांमुळे लोकांच्या अंगाची काहीली होत आहे. मुंबईसारख्या शहरात तर घामाने अंग भिजून निघत आहे. मराठवाडा, विदर्भात तर पारा थेट 40 अंस शेल्सिअसच्याही पुढे पोहोचला आहे. याच उन्हाने आता अहिल्यानगरात एक बळी घेतला आहे. येथे उष्माघातामुळे एका 50 वर्षीय व्यक्तीचे निधन झाले आहे. तर वाढते उन लक्षात घेऊन भंडारा, वर्धा जिल्ह्यात शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यातही उष्णतेचा तडाखा पाहायला मिळत आहे.
अहिल्यानगरात एका महिलेचा मृत्यू
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील प्राथमिक शिक्षिका उषा फापाळे (वय ५०) यांचे उष्माघातामुळे निधन झाले आहे. प्रखर उन्हात प्रवास केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचीही माहिती आहे. उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. ढवळपुरी पाठोपाठ पारनेर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच दुपारी ११ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात पुन्हा तापमान वाढ
गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या गोंदियावासीयांना तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा हवामानात बदल झाला असून तापमानात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या गोंदिया जिल्ह्याचे तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. उष्णतेचा तडाखा पुन्हा तीव्र झाला आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शालेय मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य तज्ज्ञांकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
भंडारा, वर्धा जिल्ह्यात शाळेच्या वेळेत बदल
भंडारा जिल्ह्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत अधिकारांचा वापर करून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला. यानुसार, सर्व शासकीय, अनुदानित, खासगी तसेच सीबीएसईसह सर्व माध्यमांच्या शाळांना सकाळी 7 ते 10 या वेळेतच वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाणी पिणे, टोपी किंवा रुमाल वापरणे याबाबत शाळांनी मार्गदर्शन करावे, असेही सांगण्यात आले. हा आदेश पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे. वर्धा जिल्ह्यातही प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून शाळा सकाली 7 ते 10 वाजेपर्यंतच असेल.
