MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?

MPSC Drug Inspector exam paper leak case: देशात आणि राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे या पेपरफुटीत बडे मंडळींचा थेट हात समोर येत आहे. यामुळे प्रशासनाची एकूणच भूमिका संशयाच्या घेऱ्यात अडकली आहे. आता एमपीएससीच्या औषध निरिक्षक पेपरफुटीप्रकरणात एमपीएससीच्या अव्वर सचिवालाही अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 3:45 PM

देशात आणि राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू आहे. शिक्षकांचा पेपर फुटल्यानंतर आता एमपीएससीचं नाक कापल्या गेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अव्वर सचिवालाही या परीक्षा घोटाळ्यात अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या अधिकाऱ्याला अटक होत असल्याने हा एका मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पेपरफुटीमधील एक लव्ह अँगलही समोर आला आहे. परीक्षा घेणारी संस्थेमधील अधिकारीच भ्रष्ट असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. या पेपरफुटीवरून विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. तर हजारो परीक्षार्थ्यांचे मनोबल कमी झाले आहे. दोषींविरोधात कठोरता कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली आहे.

MPSC च्या अव्वर सचिवाला अटक

औषध निरिक्षक पेपरफुटीप्रकरणात एमपीएससीच्या अव्वर सचिवालाही अटक करण्यात आली आहे. एमपीएससीचे अव्वर सचिव अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा दावा करण्यात येत असला तरी तो या पेपरफुटीचा एक भाग मानल्या जात आहे. कारण हा पेपर 40 लाखांना विक्री केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

आरोप करणाऱ्याची भूमिका संशयास्पद

पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटीलची भुमिकाही संशयास्पद आहे. एमपीएसीच्या दोन सहायक कक्ष अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. परीक्षार्थी ऋतुजा पाटील तिचे वडील अमृत पाटील आणि पेपरफुटीतला सूत्रधार अमृत पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. गौरव पाटीलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. गौरव पाटीलची भूमिका संशयास्पद आहे.

कधी झाली होती परीक्षा?

अन्न, औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. 22 मार्च 2026 रोजी ही चाळणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. मुलाखतीसाठी 506 उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीत घेण्यात आल्या. यानंतर पात्र 485 आणि 3 अपात्र अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

Follow Us