तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
खवड्या डोंगर प्रकरणातील कुणाल चांदगुडेच्या मावस बहिणीने सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कुणाल त्याच्या बहिणीसोबत नाचताना दिसत आहे.

खवड्या डोंगर प्रकरणातील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कुणालच्या आठवणींना उजाळा देताना त्याची मावस बहीण अक्षराने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. कुणालसोहत नाचतानाचा व्हिडीओ शेअर करत तिने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टमधून कुणालच्या जाण्याचं दु:ख आणि त्याच्याशी असलेलं जिव्ह्याळ्याचं नातं स्पष्टपणे जाणवत आहे. अक्षराने कुणालसोबतचा आनंदाचा क्षण आठवत लिहिलं, “कसं सांगू रे कुणाला या सगळ्यांना? नाही कळत आहे रे कुणाला की तूसुद्धा लहानच होता. नाही विसरू शकत रे तुला कोणी. जमलं तर माफ कर आम्हाला. नाही वाचवू शकलो आम्ही तुला.”
कुणालने असं काही पाऊल उचलेल, याची कल्पनाही नव्हती, असंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याला आनंदी पाहिलेल्या व्यक्तींनाच त्याच्या जाण्याचं दुःख किती मोठं आहे, हे समजू शकतं, अशी भावना अक्षराने व्यक्त केली. अक्षराने कुणालने दिलेल्या आश्वासनांची आठवणही करून दिली. “तुझे सगळे प्रॉमिसेस आज पण लक्षात आहेत माझ्या. तू मला अर्ध्या रात्री आवाज दे, मी तुझ्या एका आवाजावर येईन,” असं कुणालने तिला म्हटलं होतं, असं तिने लिहिलं. मात्र आता कुणालच नसल्यामुळे “मग आता? आता मी काय करणार?” असा भावनिक सवाल तिने केला आहे. तिच्या या शब्दांतून जवळची व्यक्ती गमावल्याचं दुःख किती खोलवर आहे, याची जाणीव होते.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
कुणालच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिताना अक्षराने त्याला हुशार आणि दुसऱ्यांना धीर देणारा व्यक्ती म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी तो खूप संवेदनशीलही होता, असं तिने सांगितलं. “तुझ्या सहनशीलतेच्या पलीकडे गेल्या होत्या या गोष्टी. मला माहितीये तू त्रासात होता. पण हे सगळं नको व्हायला होतं,” असं म्हणत तिने कुणालच्या मानसिक अवस्थेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. कुणालसोबतचा नाचतानाचा व्हिडीओ आणि त्यासोबत लिहिलेल्या या भावुक शब्दांमुळे सोशल मीडियावरही अनेक जण भावूक झाले आहेत. आनंदाच्या क्षणांची ही आठवण आता कुणालच्या कुटुंबीयांसाठी आणि जवळच्या व्यक्तींसाठी कायमची भावनिक आठवण बनली आहे.
