
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या पाहुण्यांचीच आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. नागपूर येथील रंजना नागपूरकर या महिलेने आपली आपबिती मांडल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, रंजना नागपूरकर या महिलेचे पती पोलीस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल लावून देण्यासाठी धनंजय मुंडे यांना १७ लाख रुपये देण्यात आले होते, असा दावा रंजना यांनी केला आहे. मात्र, पैसे घेऊनही काम झाले नाही. या आर्थिक व्यवहारामुळे आणि कामाच्या चिंतेमुळे निर्माण झालेल्या प्रचंड मानसिक दबावाखाली पती प्रदीप नागपूरकर यांचा मृत्यू झाला, असा खळबळजनक आरोप या महिलेने केला आहे.
जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचा संबंध थेट फडणवीस कुटुंबाशी असल्याचे म्हटलं आहे. “देवेंद्रजी, तुम्हाला कदाचित हे माहितीही नसेल, पण तुमच्याच जवळच्या नातेवाईकांसोबत हा प्रकार घडला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी नागपूरकर यांच्या घरी दिलेली आहे. म्हणजेच हे तुमचे जवळचे पाहुणे आहेत. आज सकाळी रंजना नागपूरकर माझ्याकडे आल्या होत्या, त्या प्रचंड रडत होत्या. त्यांच्या पतीच्या निधनाला हेच प्रकरण कारणीभूत आहे”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
रंजना नागपूरकर यांनी केलेले आरोप केवळ पैशांच्या फसवणुकीपुरते मर्यादित नाहीत. पतीच्या निधनानंतर जेव्हा त्या आपले हक्काचे पैसे परत मागण्यासाठी परळी येथे गेल्या, तेव्हा त्यांना धनंजय मुंडे यांच्या समोरच पिस्तूल लावून धमकावण्यात आले, असा दावा त्यांनी केला आहे. पैसे तर मिळाले नाहीतच, पण जीवे मारण्याची भीती दाखवून त्यांना हाकलून देण्यात आले, असेही त्या महिलेने नमूद केले.
दरम्यान सत्ताधारी महायुतीमध्ये धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र असताना स्वतःच्याच मंत्र्याकडून मुख्यमंत्र्यांच्या पाहुण्यांची फसवणूक झाल्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावर धनंजय मुंडे काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.