Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे आक्रमक मागणी केली आहे. 58 लाख नोंदी दिल्यानंतर आता तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी त्यांची अट आहे. सरकारी शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत त्यांनी तलाठी व ग्रामसेवकांना प्रमाणपत्राची यादी लावण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. 29 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला आहे.

तुम्ही आम्हाला 58 लाख नोंदी दिल्या आहेत. आम्ही म्हणतो आता तुम्ही आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही तलाठी, ग्रामसेवक आणि तत्सम अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र द्यायला सांगा. यादी लावायला सांगा, अशी अटच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे ठेवली आहे. राज्याचे मंत्री शंभुराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाड हे अंतरवली सराटीत आले आहेत. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत. या चर्चेच्यावेळी जरांगे यांनी ही मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्टपासून उपोषणाचं हत्यार ते उपसणार आहेत. याचदरम्यान त्यांच्याकडून सरकारवर चौफैर टीकास्त्र सोडण्यात आलं. जरांगे यांची आक्रमक भूमिका आणि या आंदोलनाचं काउंटडाऊन सुरू झालेलं असताना नेत्यांची धावाधाव सुरू झाली. जरांगे यांच्या भेटीसाठी आज दुपारी सरकारचं शिष्ट मंडळ अंतरवाली सराटीत दाखल झालं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्याशी चर्चा सुरू असून 58 लाख नोंदीवरून जरांगे सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत.
नोंदी कमी होऊ देणार नाही
तुम्ही जिल्हानिहाय आकडा दिला. शिंदे समितीने दिलेली आकडेवारी दिली. जुन्याच नोंदी नव्याने शोधल्या. हे आम्हाला सरकारने स्वत: लिहून दिलं. विखे पाटलांनीही तीन महिन्यापूर्वी लिहून दिले. मी आकडेवारी कमी होऊ देणार नाही. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने आम्हाला 58 लाख नोंदी दिल्या. नव्याने 58 लाख नोंदी शोधल्या. जुन्या काहीच नाही. मंत्र्यांनी आणि शिष्टमंडळाने वारंवार सांगितलं आहे. मीडियात त्यांचे बाईट आहेत, असं जरांगे म्हणाले.
थेट फोनवरून चर्चा
यावेळी मनोज जरांगे यांनी शिंदे समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी 58 लाख नोंदी जुन्याच आहेत. पण नव्याने सापडल्या आहेत. आपण त्या उपलब्ध करून दिल्या आहेत. काहींच्या वडिलांचं खरेदी खत झालं होतं, पण ते सापडत नव्हते. कुणबी नोंद आहे पण, प्रमाणपत्र नव्हते. ते आता आपण उपलब्ध करून दिले आहेत. दस्ताऐवज उपलब्ध करून दिले आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर जरांगे यांनी शिष्टमंडळाला मला जे क्लिअर व्हायचं होतं ते झालं आहे, असं सांगितलं.
एकूण नोंदी किती?
तुम्ही 1986 लिहा की 1972 लिहा, त्यांनी जुन्या नोंदी नव्याने उपलब्ध करून दिल्या. 58 लाख नोंदी त्यांनी शोधून काढल्या. जुन्याच होत्या. पण माहीत नव्हत्या, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आतापर्यंत 58 लाख 90 हजार 155 नोंदी आढळल्या आहेत.
