आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil : सरकारच्या शिष्ठमंडळासोबत चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.यावेळी जरांगे पाटील भावुक झाल्याचे पहायला मिळाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आंतरवाली सराटीत सुरू झालेल्या त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांची तब्येत काही प्रमाणात खालावली आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर आता सरकारनेही हालचाल सुरू केली आहे. सरकारच्या शिष्ठमंडळासोबत चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळामध्ये जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा समावेश आहे. यावेळी जरांगे पाटील भावुक झाल्याचे पहायला मिळाले. जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल काय म्हणाल्या?
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जरांगे पाटलांशी बोलताना म्हटले की, आम्हाला आपली खुप काळजी आहे म्हणून इथे आलो आहे. जे शिबिर लावतात, त्यात जास्तीत जास्त प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य आहे ते आपण करत आहोत. सरकार सराकात्मक आहे. हैदराबाद गॅजेटच्या नोंदींनुसारही प्रमाणपत्र दिले जात आहे. सातारा आणि कोल्हापूर गॅजेटवरही प्रक्रिया सुरू आहे. जात प्रमाणपत्रांसाठी नोडल अधिकारी नेमणार आहोत. प्रांत अधिकारी यांनी दिलेला दाखला मोठा पुरावा मानला जातो. व्हिलिडीटी फार कमी केसेसमध्ये लागते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन काहीतरी मार्ग काढणार आहे. एकही मुलाचे नुकसान होणार नाही.
आमच्या मुलांचे वाटोळे झाले…
यावर बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, तुम्ही आलात तुमचा सन्मान आहे. तुमचा वेळ वाया घालवू नका. सरकार जाणून बुजून वेळ वाया घालवत आहे. ते तुमच्या आवाक्यातले नाहीत. यानंतर तुम्ही येऊ नका, तुमच्या स्तरावरच्या गोष्टी नाहीत. तुमची फरपट करून घेऊ नका. तुमचा अपमान करत नाहीये. आमच्या मुलांचे वाटोळे झाले. 29 तारखेला 1 वर्ष झाले. प्रत्येत गावात शिबिर सुरू होऊ शकते. कशाला पाहिजे 4 महिने? सकाळी जीआर काढा. मला उद्या सकाळपासून सुरुवात पाहिजे. त्यांना सांगा तो माणूस ऐकायला तयार नाही.
मी चर्चेसाठी तयार आहे…
पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, आपल्या कार्यालयात 6 व्हॅलिडिटी पडून आहेत. मी आपल्या अधिकाऱ्याला फोन लावून दिला होता. 6 महिने झाले अजून काही झाले नाही. उगाच त्रास घेऊ नका. तुम्ही अभ्यास करून अधिकारी झाला आहेत. यातील एका ही मंत्र्याने पुस्तक वाचले आहे का? मला शायनिंग शिकवत आहेत. यांचं तुम्हाला ऐकावं लागत. मला रक्ताच्या उलट्या होत आहेत. मी चर्चेला तयार आहे. मंत्राला तुमचे पुस्तक वाचायला द्या येते का पाहू. तुम्ही जा आणि त्यांना सांगा जीआर आणा.
आंतरवालीत रक्ताचा चिखल झाला होता…
पुढे भावुक होत जरांगे पाटलांनी म्हटले की, आजच्या दिवशीच आमच्या लोकांवर गोळ्या घातल्या होत्या. आमची मुल त्यांच्या आईबापाला शोधत होती. अजूनही काही लोकांना चालताही येत नाही. रक्ताच्या थारोळ्यात आमचे लोक पडले होते. इंग्रज आणी मुघलांनी जसे केले त्यापेक्षा वाईट केले. 15 दिवस रक्ताचा वास येत होता. रक्ताचा चिखल झाला होता.