…तर रस्ते बंद होतील, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले आता माघार नाही
मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आता पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, मोठा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, ते पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करणार आहेत, हे निर्णायक आंदोलन असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्या दिवशी ताबडतोब प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की अर्जाची टेेडन्सी नाही, मी तुम्हाला टेंडन्सी दाखवतो, तुमचा माणूस पाठवा असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तुम्ही अंतरवालीत या आम्ही तुम्हाला उत्तर देतो, समोरासमोर मराठ्यांना कळू द्या, की मराठे जी माहिती सांगत आहेत ती चुकीची आहे की सरकार सांगते ती माहिती चुकीची आहे मराठ्यांना एकदा कळूच द्या, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही म्हणतात बलिदान देणाऱ्या कुटुंबाला नोकरी दिल्या आहेत म्हणून, मी तुम्हाला दाखवतो, नोकऱ्या मिळाल्या नाहीत. तुम्ही म्हणतात ना 900 केसेस मागे घेतल्या, त्या केसेस तशाच आहेत हे देखील मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणता 58 लाख कुणबी नोंदीनुसार प्रमाणपत्र दिले, मी तुम्हाला दाखवतो तुम्ही प्रमाणपत्र दिले नाहीत म्हणून, तुम्ही म्हणतात ना सगळे व्यवस्थित चाललय, परंतु एक वर्षाचा काळ गेल्या 29 ऑगस्ट 2025 पासून आता 26 पर्यंत रेकॉर्ड समितीने नोंदीच शोधल्या नाहीत, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे साहेबांना सहाच महिन्याचा वेळ दिला होता, 58 लाख नोंदी त्या माणसाने शोधल्या. तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्ही म्हणता आमचं नावच घेत नाहीत. मी आता विखे पाटील आणि फडणवीस साहेबांचा जप सुरू केला आहे, तरीसुद्धा तुम्ही मागण्या माण्य करत नाहीत. 58 लाख नोंदी कमी करू नका, त्यातील एकही नोंद कमी करू नका, सध्या नोंदी कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही आम्हाला येड्यात काढायचं काम करू नका, नाहीतर रस्ते बंद होतील, असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
