
सध्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा नवा वाद सुरु झाला आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना जाहीर इशारा दिला आहे. “माझा काहीच मॅटर नाही. मी केलेल्या प्रत्येक आरोपांवर जर फौजदारी खटले दाखल केले ना, तर माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये काढावं लागेल, हे लक्षात ठेवा,” अशा कडक शब्दात त्यांनी सुनावले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. माझा काहीच मॅटर नाही. मी केलेल्या प्रत्येक आरोपांवर जर फौजदारी खटले दाखल केले ना, तर माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये काढावं लागेल. हे लक्षात ठेवा. मी याबद्दल आणखी काही कारवाई केलेली नाही. त्यामुळे तू शहाणा हो. आणखी माझ्या नादी लागू नको. मी जर मागे लागलो तर तुझी जवळपास २२ पेक्षा जास्त प्रकरणं माझ्याकडे आली आहेत. त्यामुळे तू आणखी शहाणा हो. नाहीतर लय लांब जाशील, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
यावेळी जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या एका खळबळजनक प्रकरणाचा उलगडा केला. आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची एक नागपूरची महिला माझ्याकडे आली होती. ही सकाळची गोष्ट आहे. म्हणून तू सावध हो. हा मॅटर इतका भयानक आहे. कारण शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना माहितीही नसेल. त्यांच्याच पाहुण्यांमध्ये इतकी मोठी फसवणूक झाली हे त्यांना माहितीही नसेल. रंजना प्रदीप नागपूरकर ही महिला माझ्याकडे येऊन इतकी रडत होती, याच टेन्शनमुळे तिचा नवराही मेला आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान रंजना नागपूरकर यांनी त्यांच्यासोबत मोठी आर्थिक किंवा मालमत्तेची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. रंजना नागपूरकर यांच्या दाव्यानुसार, पोलीस दलात कार्यरत असलेल्या त्यांच्या पतीच्या एका प्रकरणाच्या निकालासाठी त्यांनी धनंजय मुंडे यांना १७ लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे देऊनही त्यांचे काम झाले नाही आणि उलट त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास देण्यात आला. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि निर्माण झालेल्या दडपणामुळेच पती प्रदीप नागपूरकर यांचा मृत्यू झाला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, पतीच्या मृत्यूनंतर जेव्हा त्या परळी येथे पैसे परत मागण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांना पिस्तूल लावून धमकावण्यात आले. हा सर्व प्रकार मुंडे यांच्या समोरच घडला, असा दावा त्यांनी केला आहे.