Manoj Jarnage Patil : ‘आपण टेकविणार म्हणजे…’, अंजली दमानिया यांच्या गौप्यस्फोटानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
Manoj Jarnage Patil : "शेततळी होती, ती काम झालेली नाहीत. घरकुली विहिरी अशी बरीच प्रकरण त्यात आहेत. हे पाप झाकणार नाही. कोणताही माणूस त्याला जवळ करणार नाही" असं मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडेंबद्दल म्हणाले. भगवान गडाने धनंजय मुंडे यांचा पाठिंबा काढून घ्यावा असं अंजली दमानिया म्हणाल्या. त्यावर त्यांनी पाठिंबा ठेवावा किंवा काढावा आम्हाला काय करायचय? जे काही आहे, ते आज राज्याला दिसतय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“पहिल्यापासून तो खूपच घोटाळेबाज, लफेडबाज आहे. राज्याला तो मोठा दुर्देवी डाग आहे. गोरगरीबांची, शेतकऱ्यांची, ओबीसींच सहकार्य घ्यायच आणि त्यांच्याच ताटात माती कालवायची हा त्याचा एक पिंड झालेला आहे. गरज आहे तो पर्यंत जवळ घ्यायच, त्यांनाच मग चुरून खायचा. ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. ती आता उघडी पडली. आधी लोक बोलत नव्हते आता बोलायला लागले. या राज्यातला एक मंत्री एवढा भ्रष्टाचार करत असेल, तर सरकार त्याला जवळ करतच कसं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांचे घोटाळे बाहेर काढणार असं तुम्ही म्हणाला होता, यावर सुद्धा मनोज जरांगे पाटील बोलले. “मी आता मागे लागणारच आहे. मी ज्या- ज्या वेळेस मागे लागतो, तेव्हा माणसाला टेकवितोच त्या शिवाय आपण गप नाही बसतं. आपण टेकविणार म्हणजे टेकविणार. त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीने घडवून आणलय. त्याला आता सुट्टी नाही. आज माझ्या काही तपासण्या आहेत. उद्या सुट्टी घेतल्यानंतर मी अंतरवली सराटीत जाऊन दर्शन घेणार, त्यानंतर शहागंज अंकुशनगरला जाणार आहे. त्यामुळे मी आता बरोबर टप्याटप्याने मागे लागतोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘बीड जिल्ह्याला हा मोठा कलंक’
“बीड जिल्ह्याला हा मोठा कलंक आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल. आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय, याच्यात जाती- पाती ओबीसीची संबंध नाही. पाप करायचं, गोरगरीब शेतकऱ्यांचा विमा खायचा. गोरगरीबांना मिळून द्यायच नाही, गोरगरीबांचा कैवारी असं बीड जिल्ह्याला दाखवायचं. आता जनतेचे डोळा उघडतील. बीडची जनता धनंजय मुंडेला माफ करणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘गोरगरीब शेतकऱ्यांच रक्त नका पिऊ रे’
“हे सगळे लोक सारखेच आहेत असं म्हणायची वेळ आलीय. सगळे लोक सारखेच आहेत. यांना फक्त त्यांच्यावर प्रेम आहे. बाकीच्या जनतेवर प्रेम नाही. यांच्या पलीकडे नाही हे सिद्ध व्हायला लागलय. अंजली दमानिया यांनी सांगितलं ते शॉकिंग आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच रक्त नका पिऊ रे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
धनंजयने गुन्हे करण्यासाठी टोळ्या तयार केल्या
“धनंजय संघटित गुन्हेगारी घडवून आणतो, त्यावर 302 दाखल करावा. तो सगळ्यांना सोबत घेऊन फिरतो. माझ्याकडे आला तेव्हा तो ( कराड ) सोबत होता, तो रोज सोबत आहे, त्याला माहित नाही का, हा गुन्हेगार आहे म्हणून धनंजयने गुन्हे करण्यासाठी टोळ्या तयार केल्या आहेत. सगळे गुन्हे या टोळ्या करतात. या लोकांना मुंडे वापरून घेतात” असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
अभिनेते राहुल सोलापूरकरच्या वक्तव्यावर जरांगे काय म्हणाले?
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ही मूर्खांची पिलावळ आहे, यांची थोबाड फोडणं गरजेचं आहे, यांनी महापुरुषावर असे शिंतोडे उडवले की ठोकले पाहिजे. याना कलाकार म्हणू नये. इथून पुढं बोलले की कुणीही असो याला दंडके रटके द्यायला हवे. राजांविषयी असं बोलणं योग्य नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.