
ऑगस्ट महिना मुंबईत मोठ्या घडामोडींचा ठरू शकतो. मराठा आरक्षणासाठी भगव वादळ पुन्हा मुंबईत धडकू शकते. गेल्या वेळी मुंबईच्या वेशीवर, वाशी येथे हे आंदोलन थापविण्यात महायुती सरकारला यश आले होते. पण त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यातच मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले नाही. सगेसोयरे अध्यादेश आणि त्याची अंमलबजावणीची प्रतिक्षा आहे. या आणि इतर मागण्यांसाठी आता मराठा समाजाचा लाँग मार्च मुंबईत धडकेल. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सज्जड दम भरला.
चूक झाली की किंमत मोजावी लागेल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनात जर काही चूक झाली तर त्याची किंमत मोदींना सुद्धा मोजावी लागेल. एकदा आमची डोके फुटले आहेत आता आई बहिणीला जर धक्का लागला तर आता माफी नाही, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारला दिला. 29 ऑगस्टच्या अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधून राज्य सरकारला सज्जड दम भरला आहे.
आमच्याच विटांनी फोडली आमचीच डोकी
अंतरवाली सराटीचा तो विषय निघाला तर माझं काळीज चरल्यासारखं होतंय, आमच्याच घराच्या विटांनी आमच्याच लोकांची डोकी फोडल्याची आठवण त्यांनी काढली. ज्यावेळी बंदुकीतील गोळ्या संपल्या त्यावेळेस उलट्या बंदुका करून आम्हाला मारलं, असे ते म्हणाले. आम्हाला जर आता अडवलं तर महाराष्ट्रातील पानंद रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही, ती भानगड आता करू नका. कारण तुम्हाला ती सवय आहे तुम्हाला जनतेची माया नाही. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ करत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
तर आता चुकीला माफी नाही
आई-बहीण आणि पोरांवर हात पडला तर मराठे कुठल्याही थराला जातील एवढे लक्षात ठेवा. अन मराठे बार बार मार खायला मोकळे नाहीत हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. आता चुकीला माफी नाही. आता मराठे सरकारचा मार निमुटपणे खाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ते सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत. मोर्चाच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे.