परीक्षेला कॉपी नाही, चुकीला माफी नाही, बारावीच्या परीक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
बारावीची परीक्षा आजपासून ( 21 फेब्रुवारी ) सुरु झाली असून परीक्षेला 15 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा | 21 फेब्रुवारी 2024 : विद्यार्थ्यांच्या करीयरला दिशा देणारी बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यभरात सुरु झाली आहे. या परिक्षेला राज्यभरातून 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. या परिक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. पेपर फुटी टाळण्यासाठी नव्या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी निर्धास्तपणे परीक्षा द्यावी असे आवाहन सरकारने केले आहे. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी आणि कॉपी सारखी कुप्रथा रोखण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रातील सर्व घडामोडी रेकॉर्ड करण्याची चाचपणी सुरु आहे. त्यामुळे कोणतीही गडबड होऊ नये यासाठी परीक्षा मंडळ सुसज्ज झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांचे करीयर ठरविणारी असल्याने या परीक्षेसाठी विद्यार्थी जीव तोडून अभ्यास करीत असतात. या परीक्षेतून सर्वांना आपल्या आयुष्याची पुढील दिशा निश्चित होत असल्याने एका-एका मार्कांसाठी विद्यार्थी अभ्यास करीत असतात. यंदाची बारावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार तसेच कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यापुढे परीक्षेला कॉपी नाही, अन् चुकीला माफी नाही, असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिला आहे.
अभिनव प्रयोग
बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच ऑनलाईन संनियंत्रणाचा अभिनव प्रयोग करण्यात येणार असल्याचे ही नरवाडे यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील इयत्ता 12 वीच्या 117 परीक्षाकेंद्रावर सुमारे 1350 वर्गखोल्यांमध्ये 33 हजार 757 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्वच परीक्षा केंद्रावर आणि वर्गखोल्यामध्ये CCTV उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशावेळी झूम ऑनलाईन मॉनिटरींग सिस्टीमची चाचपणी सुरु आहे. यामाध्यमातून परीक्षा वेळेत प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीतील घडामोडी पेपरच्या वेळेत सकाळी 10 .30 ते 2.30 या वेळेत रेकॉर्ड करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर अथवा आवश्यकतेप्रमाणे तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात येणार आहेत. या कक्षामध्ये परीक्षा काळातील लाईव्ह फीड मॉनिटर, रेकॉर्ड केला जाणार आहे. भयमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी उचललेले हे पाऊल भविष्यात निर्णायक ठरेल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच इयत्ता 10 आणि 12 वी परीक्षा होईपर्यंत परीक्षा यंत्रणेतील सर्व घटकांवर विविध माघ्यमांव्दारे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले