उद्यापासून पावसाळी अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; या मुद्द्यावरून होणार सरकारची कोंडी
22 जूनपासून राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, विरोधकांकडून सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्यात आला आहे.

राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, भास्कार जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर नेत्यांची उपस्थिती होती. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भास्कर जाधव यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. यंदा महाराष्ट्रावर अल् निनोचं संकट आहे. सरकारने आधीच याबाबत माहिती दिली आहे, महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो असंही सरकारने म्हटलं आहे, परंतु मग अल् निनोच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सरकारने काय तयारी केली? असा सवाल यावेळी भास्कर जाधव यांनी केला आहे, कार्यपद्धती सुधारण्यापलिकडे हे सरकार गेलं असल्याचं यावेळी भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यात शेतकऱ्यांच्या कोणत्याही भावाला हमीभाव नाहीये, आता सरकार सगळीकडे हेच सांगत सुटेल की आम्ही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली, परंतु शेतकऱ्यांच्या समस्या आहेत तशाच आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी केली होती, तेव्हा एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी संदर्भात तक्रार आली नव्हती असंही यावेळी भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरून देखील विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेला केवायसी सक्तीची केली, त्यानंतर जवळपास 81 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं. मग सरकारने फक्त निवडणुकीसाठीच ही योजना सुरू केली होती का? ज्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला त्यांचं काय? असा सवालही यावेळी भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान राज्यात काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, यामध्ये शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी देखील या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांकडून करण्यात आली.