एसटी कर्मचारी खवळले, आज दुपारपासून…; ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची बातमी

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा ६५०० रुपयांचा हप्ता रखडल्याने संदिप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात येत असून सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचारी खवळले, आज दुपारपासून...; ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची बातमी
msrtc
| Updated on: Feb 12, 2026 | 12:25 PM

राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) हजारो कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाचा सरकारला विसर पडल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूवीर आज दुपारी १.३० वाजता राज्यातील सर्व एसटी डेपोमध्ये कर्मचारी एकवटणार आहेत. थकीत पगारवाढीचा मुद्दा त्वरित मार्गी न लागल्यास हे आंदोलन उग्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा ६,५०० रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. या निर्णयामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे केवळ दोन महिने हे वाढीव पैसे कर्मचाऱ्यांना मिळाले. त्यानंतर हा हप्ता अचानक बंद झाला. सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही, हा कर्मचाऱ्यांचा विश्वासघात आहे, अशी भावना कामगार नेते संदिप शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतरही निर्णय शून्य

या विषयावर तोडगा काढण्यासाठी कर्मचारी प्रतिनिधींनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट घेतली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या या भेटीत प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिली होता. त्यावेळी त्यांनी १२० कोटी रुपयांच्या फाईलवर स्वाक्षरी करून पगारवाढीचा प्रश्न कॅबिनेटमध्ये निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कॅबिनेट बैठक होऊनही पदरात काहीच न पडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे भान, पण सरकारला इशारा

सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी एसटीवरच अवलंबून असतात. विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. म्हणूनच आम्ही सध्या फक्त निदर्शने करत आहोत. मात्र, सरकारने आम्हाला टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडू नये, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. जर वेळीच तोडगा निघाला नाही, तर परीक्षेच्या काळातच एसटीची चाके थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

  • थकीत ६,५०० रुपयांच्या पगारवाढीचा हप्ता त्वरित लागू करावा.
  • पगारवाढीबाबत तात्पुरते मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा.
  • १२० कोटी रुपयांच्या प्रलंबित फाईलला त्वरित मंजुरी द्यावी.