लालपरीला ब्रेक लागणार, कामगारांच्या एका निर्णयामुळे प्रवाशांची धाकधूक वाढली
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकबाकीचा हप्ता रखडल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप. प्रताप सरनाईक यांच्या आश्वासनानंतरही फेब्रुवारीच्या पगारात कपात झाल्याने १२ फेब्रुवारीपासून आंदोलनाची हाक दिली आहे.

राज्य परिवहन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि थकीत वेतनवाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या थकबाकीचा हप्ता देण्याबाबत सरकार आणि महामंडळ स्तरावर हालचाली होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास १२ फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
आश्वासनांची पूर्तता कागदावरच?
परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिले होते. २०२० ते २०२४ या चार वर्षांच्या काळातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६,५०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीमुळे निर्माण झालेली थकबाकी कर्मचाऱ्यांना ४८ समान हप्त्यांमध्ये देण्याचे निश्चित झाले होते. या निर्णयाची अंमलबजावणी डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली. मात्र फेब्रुवारी २०२६ च्या पगारात हा हप्ता गायब असल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आर्थिक गणित कोलमडले
एसटी कर्मचारी अल्प वेतनात काम करत आहेत. वाढीव हप्त्यामुळे त्यांच्या हातात काही अधिकची रक्कम पडत होती. महागाईच्या काळात घरखर्च, बँकांचे हप्ते आणि मुलांच्या शैक्षणिक शुल्काचे नियोजन कर्मचाऱ्यांनी या वाढीव वेतनावर केले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पगारात हप्ता न आल्याने कामगारांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही, अशी भावना कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
काय आहेत संघटनेच्या प्रमुख मागण्या?
- ११ फेब्रुवारीपर्यंत रखडलेला थकबाकीचा हप्ता त्वरित खात्यात जमा करावा.
- वेतन करारातील प्रलंबित मुद्द्यांवर प्रशासनाने तातडीने बैठक घ्यावी.
- भविष्यात हप्ते रोखले जाणार नाहीत याची लेखी हमी द्यावी.
जर उद्या (११ फेब्रुवारी) संध्याकाळपर्यंत महामंडळाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर गुरुवारी सकाळपासून राज्यातील सर्व आगार (Depots) आणि विभागीय कार्यालयांसमोर कर्मचारी काळ्या फिती लावून निदर्शने करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
