Mumbai Rain Alert : मुंबईकरांसाठी 48 तास धोक्याचे, नवा अलर्ट जारी; विदर्भातील या जिल्ह्यांनाही पाऊस झोडपणार

मुंबई आणि ठाण्याला पुढील 48 तास मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांसाठी 48 तास धोक्याचे, नवा अलर्ट जारी; विदर्भातील या जिल्ह्यांनाही पाऊस झोडपणार
| Updated on: Jul 06, 2026 | 1:50 PM

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत पावसाचं थैमान सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. नागरिकांना काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. आता हवामान खात्याने नवा अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार मुंबईसाठी पुढचे 48 तास धोक्याचे असणार आहेत. या 48 तासात मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अलर्टच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क झालं आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रविण कुमार यांनी हा नवा अलर्ट दिला आहे. मुंबईत पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने, मुंबईच्या काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र विदर्भात पावसाची विश्रांती आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भातील काही भागात पाऊस येणार आहे, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रविण कुमार यांनी व्यक्त केला आहे.

गोंदिया, भंडाऱ्यालाही अलर्ट

पुढील 48 तासांसाठी गोंदिया, भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावतीच्या भागातंही पावसाचा अंदाज आहे, असंही प्रविण कुमार यांनी सांगितलं. तर, येत्या 8 तारखेपर्यंत सातत्याने हे सगळे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत. पालघर, वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक रेल्वे ठप्प आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, तिथून लोकांना बाजूला काढून सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

अनर्थ टळला

दरम्यान, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्याचा फटका रत्नागिरी रेल्वे स्टेशनला बसला आहे. वादळामुळे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील छप्पर उडालं आहे. रेल्वे स्थानकाच्या छताचा 50 ते 60 फुटाचा भाग कोसळला आहे. पण सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये. सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्ञाती कंपनीला या कामाचा ठेका दिला होता. गेल्या वर्षी देखील छताला गळती झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळपणावर टीका झाली होती. आता परत मध्यरात्रीच्या सुमारास स्थानकाचे एका बाजूचे छत कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका होत आहे. रात्रीच्या वेळेस वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे आणि गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Follow Us