राज्यात दिवसभरात 6 हजार कोंबड्या दगावल्या, बगळे, पोपट, चिमण्यांचाही मृत्यू, बर्ड फ्लूचा धोका वाढला?

| Updated on: Feb 08, 2021 | 8:04 PM

राज्यावरील बर्ड फ्लूचा धोका अद्यापही टळलेला नाही. आज राज्यात 6119 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. (Bird flu in Maharashtra: 6119 poultry birds have been found dead)

राज्यात दिवसभरात 6 हजार कोंबड्या दगावल्या, बगळे, पोपट, चिमण्यांचाही मृत्यू, बर्ड फ्लूचा धोका वाढला?
Follow us on

मुंबई: राज्यावरील बर्ड फ्लूचा धोका अद्यापही टळलेला नाही. आज राज्यात 6119 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात बगळे, पोपट, कावळा चिमण्यांसह इतर सात पक्ष्यांचा समावेश आहे. सर्व पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेत तसेच पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, पक्ष्यांचा राज्यात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असून काही पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचं स्पष्ट झाल्याने राज्यात बर्ड फ्लूने डोकंवर काढल्याचं बोललं जात आहे. (Bird flu in Maharashtra: 6119 poultry birds have been found dead)

एक लाख कोंबड्या मारल्या

राज्यात काही कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे आढळून आल्याने या पक्ष्यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला तो परिसर “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. या परिसरांमध्ये प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूमुळे कोंबड्या दगावलेल्या पोल्ट्री फार्मपासून 1 किमी अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 1,09,426 कुक्कुट पक्षी (यात नवापूर जि. नंदुरबार येथील 31,400पक्षी समाविष्ट), 44, 686 अंडी व 63,864 किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहेत. या पक्ष्यांच्या मालकांना आजतागायत 34.06 लाख रुपये अनुदान म्हणून वाटप करण्यात आले आहे.

बर्ड फ्लू रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बळ

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना 12 जानेवारी 2021 नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावलेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत.

पक्षी पाळणाऱ्यांनो नियम पाळा

कुक्कुट पालन करणाऱ्यांनी किंवा कुक्कुट पक्षी पाळणाऱ्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अंडी, मांस बिनधास्त खा, अफवा पसरवू नका

अफवा व गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्ष्यांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. कुक्कुट पक्ष्यांचे मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, असं आवाहनही करण्यात आलं आहे. (Bird flu in Maharashtra: 6119 poultry birds have been found dead)

 

संबंधित बातम्या:

कोकणातली सर्वात मोठी आंगणेवाडीची यात्रा रद्द, काय आहे ही यात्रा?

बीडचं राजकारण तापलं, नगरपालिकेच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने खळबळ

VIDEO | शॉर्टसर्किटचं निमित्त, तब्बल 40 एकरातील ऊस आगीच्या कचाट्यात, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

(Bird flu in Maharashtra: 6119 poultry birds have been found dead)