मुंबईच्या महापौराबाबत सस्पेन्स संपला, फडणवीसांचा निरोप घेऊन भाजपचा बडा नेता एकनाथ शिंदेंच्या भेटीला; काय ठरलं?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर आता महापौर पदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुंबई आणि केडीएमसीमध्ये महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मुंबईच्या महापौराबाबत सस्पेन्स संपला, फडणवीसांचा निरोप घेऊन भाजपचा बडा नेता एकनाथ शिंदेंच्या भेटीला; काय ठरलं?
eknath shinde devendra fadnavis
| Updated on: Jan 22, 2026 | 8:40 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) महायुतीने दणदणीत यश मिळवले. यानंतर आता महापौर पदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत आणि केडीएमसीमध्ये (KDMC) कोणत्याही परिस्थितीत महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुंबईत १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालात भाजपने ८९ जागा जिंकत सर्वात मोठ्या पक्षाचा मान मिळवला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. तसेच दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (UBT) ६५ जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत (११८ जागा) असल्याने मुंबईवर आता भाजप-शिंदे गटाची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल, यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी एकत्र आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महापौर पदाबाबत सुरु असलेल्या चर्चेवर प्रवीण दरेकर यांनी भूमिका स्पष्ट केली. केडीएमसी संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष सक्षमपणे काम करत आहेत. आजची मुख्यमंत्र्यांची भेट ही निव्वळ सदिच्छा भेट होती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. श्रीकांत शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांनी आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे महायुतीमध्ये समन्वय आहे. त्यामुळे तिथे महायुतीचा महापौर होईल,” असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे राज्याच्या प्रगतीकडे लक्ष

निवडणूक निकाल आणि महापौर पदाची निवड या सर्व धावपळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला (World Economic Forum) गुंतवणुकीसाठी गेले आहेत. याबद्दलही प्रवीण दरेकरांनी भाष्य केले. निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहेच, पण त्यापेक्षाही महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणणे मुख्यमंत्र्यांनी जास्त महत्त्वाचे मानले आहे. राजकारण बाजूला ठेवून ते सध्या राज्याच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करत आहेत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

वरिष्ठ नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेणार

दरम्यान, महायुतीच्या विजयानंतर मुंबईच्या नव्या महापौराची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने महापौराचा मान भाजपला मिळावा, असा एक सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही या विजयात मोलाचा वाटा उचलल्याने सत्तेचे समीकरण कसे जुळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. येत्या काही दिवसांत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.