मुंबई महापालिकेत शिवसेना, काँग्रसेसोबत युती होऊ शकते, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘या’ दोन पक्षांसोबत केली आघाडी

| Updated on: Dec 13, 2021 | 5:55 PM

वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. वंचितने मुंबई महापालिकेत इंडियन मुस्लिम लीग आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेना, काँग्रसेसोबत युती होऊ शकते, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; या दोन पक्षांसोबत केली आघाडी
prakash ambedkar
Follow us on

मुंबई: वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. वंचितने मुंबई महापालिकेत इंडियन मुस्लिम लीग आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आघाडीची घोषणा केली आहे. एमआयएमसोबत आघाडी होणार नाही. शिवसेना आणि काँग्रेसला आमचे दरवाजे उघडे आहेत, असंही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं. आंबेडकर यांनी नव्या समीकरणासाठी पर्याय खुले केल्याने त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम लीग आणि राजद सोबत आमची आघाडी झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे. इतर पक्ष संघटनाही या आघाडीत भविष्यात येऊ शकतात. काही पक्ष, संघटनांसोबत चर्चाही सुरू आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत आमचे जागा वाटप पूर्ण होईल, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत एमआयएम बरोबर युती करण्याचा विचार नाही. शिवसेना वा काँग्रेससाठीही आमचे दार उघडे आहेत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं.

एसटीला आम्ही फायद्यात आणू

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही विकासाच्या प्रश्नावरच लढणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यातील परिवहन सेवाही तोट्यात चालली असून सरकारकडे धोरणात्मक निर्णय घेण्याची ताकद नाही. आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट फायद्यात आणू, असेही ते म्हणाले. साधारणत: जानेवारीच्या मध्यापर्यंत यातील जागावाटप निश्चित करून प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर करण्यात येईल. या वाटाघाटीं मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर, ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार महेंद्र रोकडे, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई महानगर अध्यक्ष अबुल हसन खान, अब्दुल बारी, प्रोफेसर मापारी यांनी बोलणी करून वाटाघाटी यशस्वी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

भाजपला पाडल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही

सर्वोच्च न्यायालयाला हवा असलेला इम्पिरिकल डेटा हा जनगणनेतूनच मिळू शकतो. कोर्टाने राखीव जागांना विरोध केलेला नाही. राखीव जागांना पाठबळ देणारा मागासलेपणाचे मोजमाप करणारा डेटा जनगणनेतून मिळेल. व हा डाटा सादर केल्यानंतर त्यानंतरच ओबीसींना आरक्षणाचा प्रश्न मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले. ओबीसी ना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी भाजपा सोडून कोणालाही मतदान केले पाहिजे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाडल्याशिवाय ओबीसींची जनगणना होणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केलं.

तर एमआयएमचा विचार होऊ शकतो

ओबीसींनी औरंगाबाद लोकसभेत सेक्युलर भूमिकेतून मतदान केले असूनही औरंगाबादमधे एमायएमने सेक्युलर भूमिकेतून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाता येत नाही. ओबीसींना विश्वास देण्याचे काम एमआयएमने केले तर आगामी काळातील निवडणुकांबाबत विचार होऊ शकेल. असेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत तसेच राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय कंडारे, मुंबई अध्यक्ष अकबर अली खान, मुंबई युवा अध्यक्ष मुर्तुझा शेख, मुंबई युवा महासचिव सोहेल अन्सारी तसेच  इंडियन युनियन मुस्लिम लीगचे महाराष्ट्र महासचिव सी एच अब्दुल रहमान, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच प्रवक्ते अब्दुल रहमान, कॉल अब्दुल मुल्ला, खजिनदार डॉक्टर इब्राहीम कुट्टी हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: ओबीसी समाज मुस्लिम धर्म स्वीकारणार का?; प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

रोहित पवारांच्या खेळीचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध, भाजपवर उमेदवार बदलण्याची नामुष्की

Kashi Vishwanath Corridor : पंतप्रधान मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत जेवण आटोपलं, फोटोंची चर्चा