बेस्टचे आजी-माजी कर्मचारी एकटवले; या तारखेनंतर दिला बेमुदत संपाचा इशारा
बेस्टच्या आर्थिक परिस्थितीचा बोजवारा उडाल्याचा आरोप करीत निवृत्तीनंतरची देणी न मिळाल्याने बेस्टच्या १२ संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या ८ जून रोजी बेस्ट कामगारांचा मेळावा असून त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटली जाणारा बेस्टचा परिवहन उपक्रम दिवसेंदिवस आर्थिक दिवाळी खोरीच्या उंबरठ्यावर चालला आहे, एकेकाळी फायद्यात असणारा बेस्टचा विद्युत विभागाची अवस्थाही वाईट आहे.बेस्ट उपक्रमाच्या परिवहन आणि विद्युत विभागाची आर्थिक आणि प्रशासकीय स्थिती दिवसेंदिवस खालावत चालल्याचा आरोप करीत बेस्टचे आजी-माजी कर्मचारी आता एकवटले आहेत. बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी अद्याप मिळालेली नसल्याने बेस्टच्या कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे येत्या ८ जून रोजी बेस्टच्या कामगारांचा मेळावा असून या दिवशी पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन आणि विद्युत विभागाची आर्थिक तसेच प्रशासकीय स्थिती दयनिय होत चालली असून बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची देणी मिळेणासी झाली आहे. या संदर्भात बेस्टचे आजी-माजी कर्मचारी आता एकत्र आले आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी अद्याप मिळालेली नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी असल्याने बेस्टचे आजी-माजी कर्मचारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमातील एकूण १२ कामगार संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना केली आहे. कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या सोमवार, ८ जून रोजी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
कृती समितीच्या वतीने प्रशासनाला १८ जूनपर्यंत कामगारांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास बेस्टमध्ये बेमुदत संप पुकारण्याचा इशारा कामगारांच्या कृती समितीने दिला आहे.बेस्ट उपक्रमातील आर्थिक परिस्थिती, कर्मचाऱ्यांचे हक्क, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्याने आगामी काळात बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
बेस्टची दुर्दशा…
बेस्टमध्ये मालकीच्या बसेसचे प्रमाण आता अत्यंत कमी झाले आहे. कंत्राटी बसवरच बेस्टचा कारभार चालवला जात आहे. प्रवाशांना तासनतास बेस्टची प्रतिक्षा करत उभे रहावे लागत आहे. अनेक बसचे इंडिकेटर्स बंद आहेत,तसेच या बसेसची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. वातानुकूलित बसचे दरवाजे तुटले आहेत. प्रवासी जीवमुठीत घेऊन यातून प्रवास करत आहेत. त्यामुळे आता बेस्टच्या उपक्रमाचे किमान तिकीटाचे दर वाढवूनही बेस्टची सेवा सुधारली नसल्याची टीका प्रवाशांकडून होत आहे.
