ऐन हंगामात पाऊस रुसला, धरणातील पाणी साठा आटला… मराठवाड्यासह राज्यावर पाणीटंचाईचे दुहेरी संकट… आकडेवारीने काळजात धस्स

Dam Water Shortage: एकीकडे पावसाने मुहूर्त हुकवला. तर दुसरीकडे राज्यातील अनेक धरणाताली पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांवर पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे.

ऐन हंगामात पाऊस रुसला, धरणातील पाणी साठा आटला... मराठवाड्यासह राज्यावर पाणीटंचाईचे दुहेरी संकट... आकडेवारीने काळजात धस्स
राज्यावर पाणी टंचाईचे संकट
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 1:35 PM

Dam Water Shortage: मान्सूनने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. अल निनोचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे. तर पावसाने मुहूर्त हुकवला असतानाच मराठवाड्यासह राज्यातील अनेक धरणातील पाणी साठा कमी झाला आहे. पाणी साठा आटल्याने पाणी टंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे. आता शेतकर्‍यांसह सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागलेले आहेत. मान्सून अजून एक दोन दिवस उशीरा दाखल होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर जर पाऊस लांबला तर पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

मराठवाड्यातील 11 प्रमुख धरणांमध्ये केवळ 35.11% पाणीसाठा शिल्लक

मराठवाड्यातील पाणीस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जून महिन्याचे दहा दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने 11 प्रमुख धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. सध्या मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये सरासरी केवळ 35.11 टक्के पाणीसाठा शिल्लक असून अनेक धरणांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सीना-कोळेगाव धरणात केवळ 6.24 टक्के पाणीसाठा उरला आहे. पावसाअभावी धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक जवळपास थांबली असून पिण्याचे पाणी आणि खरीप हंगामासाठी आवश्यक जलसाठ्याबाबत चिंता वाढली आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास मराठवाड्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यातील 11 प्रमुख धरणांची स्थिती

एकूण सरासरी पाणीसाठा : 35.11%

जायकवाडी : 29.28%

निम्न दुधना : 29.13%

येलदरी : 54.30%

माजलगाव : 23.80%

मांजरा : 23.73%

पैनगंगा (ईसापूर) : 43.45%

निम्न मनार : 43.33%

निम्न तेरणा : 40.09%

विष्णुपुरी : 44.67%

सीना-कोळेगाव : 6.24%

पाणी साठा आटला

पुण्यातील अनेक गावांसमोर पाणी टंचाईचे संकट

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चासकमान धरणातील जलपातळी झपाट्याने घटत असल्याने राजगुरूनगर शहर आणि धरणाखालील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या धरणातील साठा दिवसागणिक कमी होत आहे. धरणात पुढील आठवडाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून, राजगुरूनगर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही मर्यादा येऊ लागल्याने पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.

पिंपरी चिंचवडकरांसाठी चिंतेची बातमी

पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक चिंताजनक बातमी आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा सुमारे २२ टक्क्यांवर, तर आंद्रा धरणातील साठा ३१ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागान महापालिकेच्या पाणी कोट्यात १५ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव मांडला असून याबाबत येत्या पंधरवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. शहराला पवना आणि आंद्रा धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाटघर धरणाने गाठला तळ

पुण्याच्या भोरमधल्या नीरा खोऱ्यातील ब्रिटिश कालीन भाटघर धरणाने तळ गाठला आहे. धरणात केवळ 10 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्यानं पाणीसाठा कमी झाला आहे. धरणांतून गेल्या तीन महिन्यांपासून होत असल्याने सततच्या पाणी विसर्गामुळे धरणानी तळ गाठला असल्यानं धरणाचे बुडीत क्षेत्र कोरडे पडू लागले आहे. 24 टीएमसी एवढी या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे. त्यामुळं भोर,खंडाळा,पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण यासह सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील शेतीला आणि गावांना या धरणातून पाणी पुरवठा होतो.

पाऊस वेळेवर दाखलं न झाल्यास, धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. धरणांच्या पाणीपातळीत घट झाल्याने धरण क्षेत्रातील काही विहिरींनी तळ गाठला, त्यामुळे तेथील गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे..यंदाच्या उर्वरित पाणीसाठ्यातून पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी पुढील काळात योग्य नियोजन करून धरणात मुबलक पाणीसाठा ठेवण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे.

उजनी धरणाची पाणी पातळी उणे 23.29 टक्के

सोलापूर जिल्हयाची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळी मायनस 23.29 टक्के असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठयात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणात 36.91 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

रायगडमध्ये भीषण पाणीटंचाई; धरणसाठा ४३ टक्क्यांवर

रायगड जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील २८ धरणांमध्ये सध्या केवळ ४३ टक्के जलसाठा शिल्लक राहिला असून काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला आहे. घोटवडे, ढोकशेत आणि उन्हेरे या धरणांमध्ये दहा टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा उरल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता आणि सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असताना मार्चपासूनच पाण्याची पातळी वेगाने घटू लागली. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ २९.७७१ दलघमी पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे अलिबाग, रोहा, म्हसळा, सुधागड, महाड, खालापूर, कर्जत आणि इतर तालुक्यांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे.

जायकवाडीची पाणी पातळी घटली

काही गावांमध्ये एक ते दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. म्हसळा तालुक्यातील वारळ, काळसुरी आणि तुरुंबाडी गावांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनली असून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. एप्रिल-मे महिन्यात चाकरमानी गावाकडे परतणार असल्याने पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तयारी सुरू करण्यात आली असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बुलढाण्यात पाण्याचे संकट गडद, ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई

बुलढाणा जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प, 7 माध्यम आणि 98 लघु प्रकल्प आहेत. या सर्व धरणातील पाणी साठा अत्यल्प झाला असून जिल्ह्यात मोठी पाणी समस्या उभी ठाकली आहे, जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पनी तळ गाठायला सुरुवात केली असून आता जिल्ह्यातील पाणी साठा 28 टक्के वर् आला असल्याने भीषण पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. खडकपूर्णा, पेन टाकळी सह कोराडी प्रकल्पतील पाणी साठा कडक उन्हा मुळे घटत चालला आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पुढील काळ आणखी पाणी टंचाई ला सामोरे जावे लागणार आहे. ग्रामीण भागातील पाणी समस्या भीषण होत चालली आहे. जिल्हा प्रशासन पाणी टंचाई वर मात करण्यास अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

धुळे जिल्ह्याचा पाणीसाठा अवघा 34% टक्क्यावर

धुळे जिल्ह्याचा पाणीसाठा अवघा 34% टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील 12 आणि 44 लघु प्रकल्पांमधील जलसाठा घटला आहे. वाढलेल्या तापमानामुळे जल साठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. येत्या आठवड्याभरात पावसाचं आगमन न झाल्यास जिल्ह्यावर पाणी टंचाईचा संकट येईल.

Follow Us