एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; आज मोठा निर्णय जाहीर करणार?

Eknath Shinde may resign as Chief Minister : एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच मुख्यटमंत्रिपद मिळावं यासाठी देखील एकनाथ शिंदे आग्रही आहेत. वाचा सविस्तर...

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; आज मोठा निर्णय जाहीर करणार?
एकनाथ शिंदे, नेते, शिवसेना
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 26, 2024 | 9:20 AM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेचा आज कार्यकाळ संपतो आहे. अशात शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. तसंच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आज काय निर्णय घेणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे. शिवाय महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निरोप कळवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. किमान दीड वर्षे मुख्यमंत्री पद द्या, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेणार की महायुतीसोबतच राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना अद्यापर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आतमुंबईत येण्याची शक्यता आहे. अमित शाह आज मुंबईत येऊन मुख्यमंत्रिपदाबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांचं ट्विट

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.