Engineering CET : सर्व्हर डाऊन झाल्यानं बोरिवलीच्या शाळेत गोंधळ, पहिल्या सत्रातली इंजिनिअरिंग सीईटी पुढे ढकलली
परीक्षेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये. या अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकलेली नाही, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असा निर्णय आम्ही निर्णय घेतला आहे, असे सीईटीचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी म्हटले आहे.
मुंबई : इंजिनिअरिंगच्या सीईटी (Engineering CET) परीक्षेत बोरिवलीच्या शाळेत सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गोंधळ उडाला आहे. 300पेक्षा अधिक विद्यार्थी त्यामुळे सीईटी परीक्षा देऊ शकलेले नाही. आज दोन सत्रात परीक्षा घेतली जाते. मात्र या शाळेमध्ये दोन्ही सत्रातील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. सर्व्हर डाऊन (Server down) असल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही. दुसऱ्या सत्राची परीक्षा दोन वाजता सुरू होणार होती. मात्र विद्यार्थी आपली परीक्षा कधी होणार, या प्रतीक्षेत या शाळेबाहेर थांबले असल्याचे चित्र दिसत होते. या बोरिवलीच्या (Borivali) शाळेतील पहिल्या बॅचची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे तर दुसऱ्या बॅचच्या मुलांना आतमध्ये घेतले आहे. तांत्रिक बाबी दुरुस्त केल्या असून त्यांची परीक्षा घेतली उशिराने घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘पालक, विद्यार्थ्यांनी काळजी करू नये’
सीईटी परीक्षेतील या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सीईटीच्या आयुक्तांनी आपली प्रतिक्रिया देऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. परीक्षेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये. या अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकलेली नाही, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असा निर्णय आम्ही निर्णय घेतला आहे, असे सीईटीचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या सत्रातील परीक्षेविषयी सीईटी आयुक्त म्हणाले…
पहिल्या सत्रातील परीक्षा तर पुढे ढकलण्यात आली. दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्व्हरची समस्या सुटल्यास आजच त्यांची परीक्षा होईल. मात्र पुन्हा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील, असेही रवींद्र जगताप यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, काहीसे उशिरा या विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मात्र काही सर्व्हर डाऊनसारख्या काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या तर त्यांचीही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते, अशीच शक्यता निर्माण झाली आहे.