Jishnu Dev Varma : कोण आहेत जिष्णू देव वर्मा? महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी तेलंगनाचे राज्यपाल होते. जिष्णू देव वर्मा हे मुळचे त्रिपुरामधील आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधून सुरुवात केली.

मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानंतर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. ते यापूर्वी तेलंगनाचे राज्यपाल होते. जिष्णू देव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ते ऊर्जा, ग्रामविकास यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री देखील होते. जिष्णू देव वर्मा हे त्रिपुरातील राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधून सुरुवात झाली, त्यांनी त्रिपुरामध्ये डाव्यांचं वर्चस्व असून देखील त्या ठिकाणी भाजपाची मजबूत मोट बांधण्याचं काम केलं.
कोण आहेत जिष्णू देव वर्मा?
जिष्णू देव वर्मा हे मुळचे त्रिपुराचे आहेत. ते त्रिपुरामधील राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी झाला. त्यांनी भाजपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी 1990 च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला, त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचं वर्चस्व असताना देखील त्यांनी त्याठिकाणी भाजपाचा जोरदार प्रचार केला. पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम केलं. त्यांनी तीनदा 1996, 1998 आणि 1999 साली त्रिपुरा इस्ट या मतदारसंघातून निवडणूक जिंकली, दरम्यान ते काही काळ त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री देखील होते. तसेच त्यांनी ऊर्जा, ग्रामविकास सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देखील सांभाळली आहे. त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते तेलंगनाचे राज्यपाल होते. दरम्यान जिष्णू देव वर्मा यांना साहित्य, आणि क्रीडा क्षेत्राची देखील आवड आहे, ते स्वत: एक चांगले लेखक आणि कवी आहेत.
इतरही राज्याचे राज्यपाल बदलले
दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रासोबतच इतरही काही राज्याचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत, त्यामध्ये पश्चिम बंगाल, नागालँड, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश या सारख्या राज्यांचा समावेश आहे.लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर नंद किशोर यादव हे नागालँडचे नवे राज्यपाल असणार आहेत.
