‘हळद गेली, सोयाबीन गेलं, मेलो तर कपाळाला लावायला रुपया नाही’; अतिवृष्टीग्रस्त आजीबाईची आर्त हाक, सरकार मदतीला धावेल का?

Crop Damage Farmer Allegation : अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा काळी झाली. गोडधोड सोडा रोजच्या जगण्याचा बिकट प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. सरकारने काय मदत जाहीर केली आणि ती कुठंपर्यंत पोहचली याचं ही आजीबाई खणखणीत उत्तर आहे.

हळद गेली, सोयाबीन गेलं, मेलो तर कपाळाला लावायला रुपया नाही; अतिवृष्टीग्रस्त आजीबाईची आर्त हाक, सरकार मदतीला धावेल का?
शेतकऱ्यांची आर्त हाक
| Updated on: Oct 22, 2025 | 11:45 AM

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्धवस्त केले आहे. शेताला तळ्याचे स्वरुप आले होते. तर नदी,नाल्या काठच्या शेती वाहून गेल्या होत्या. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा काळी झाली. गोडधोड सोडा रोजच्या जगण्याचा बिकट प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. सरकारने काय मदत जाहीर केली आणि ती कुठंपर्यंत पोहचली याचं ही आजीबाई खणखणीत उत्तर आहे. सरकार दरबारी या आजीबाईची आर्त हाक आता तरी पोहचेल का, या आजीबाईसह शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल का, असा सवाल विचारला जात आहे. सरकारला शेतकऱ्यांचं दुःख दिसलं नाही का, बंधाऱ्यावर जाण्याचा स्टंट करुन सरकारला काय मिळालं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.

नुकसान भरपाई मिळालीच नाही

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव गावात अनेकांना नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत. हळद गेली, सोयाबीन गेलं, मेलो तर कपाळाला लावायला रुपया नाही, अशी काळजाला चर्रर करणाऱ्या प्रतिक्रिया ग्रामीण भागातून उमटत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आजीने अशा शब्दात संतप्त भावना व्यक्त केल्या. सरकारला लेकीबाळी नाहीत का ? आम्हाला एक रुपया कोणी दिला नाही. मदतीसाठी गयाबाई जाधव यांनी सरकारला साकडे घातले आहे.

तुम्ही बातमी दाखवल्यावर तलाठी आला फोटो काढून गेला, रोज बँकेत जातो एकही रुपया मिळाला नाही. तीन एकर वरील हळदीचे नुकसान झाल्याने शेतकरी विठ्ठल जाधव यांनी अशी व्यथा मांडली. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव गावात अनेकांना नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत. तीन एकर हळदीचे नुकसान होऊन ही पैसे न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

आमची सोय करा, आमचं काही उरलं नाही

हळद गेली, सोयाबीन गेल सोयाबीनला दोन दोन शेंगा आहेत, सगळं सोयाबीन वावरात पचत आहे. आमची सोय कराव आमचं काहीच उरलं नाही, सरकारला तरी लेकीबाळी आहेत का नाही, सगळ्यांना लेकी आहे की, कुणब्याला कोणीच बघणार राहिले नाही कुणब्याला कोणी वाली राहिला का ? काय करायचं कुणब्याने, असा सवाल गयाबाई जाधव या आजीने विचारला.

सरकारने काहीतरी न्याय कराव आमचे वावर येऊन बघा, सरकारांनं आमच्या लेकराबाराला अनुदान द्यावं. लेकीला आणलय चटणी भाकर खातील आणि जातील आमच्यापाशी करायला आहेच काय. आम्हाला एक रुपया कोणी दिला नाही की रुपया आम्ही बघलाही नाही. कपाळाला लावायला एक रुपया नाही मरून गेलो तर तुम्ही चौकशी करा. आम्हाला ते भिकार्डे समजायला आम्ही काय भिकारी झालो का? एकतर मालाला भाव नाही नुकसान पण झाली आहे. लेकी बाळी येऊन बसलेल्या आहेत काहीतरी करावं लागल की नाही. सोयाबीन काढलय चार आठ पायल्या झालं असेल एक चुंगड भरल असेल, अशी प्रतिक्रिया गयाबाई जाधव या शेतकरी आजीनं दिली.

अजून एक रुपया मिळाला नाही

जवळपास या हळदीला मला दोन लाख रुपये खर्च आला होता, जे विकत आणून लावलेले बेन आहे ते सुद्धा निघत नाही. तुम्ही आमची बातमी यापुढे सुद्धा दिली होती बातमी दिल्यावर तलाठी आले होते त्यांनी फोटो काढून नेले दोन. आम्ही तहसीलदार सुद्धा हळद घेऊन गेलो होतो, अजिबात कोणी आलं नाही. तलाठी एकदा येऊन फक्त फोटो काढून गेले, आता ही हळद मोडून टाकावी लागते. आतापर्यंत आम्हाला एक रुपया सुद्धा आला नाही, आम्ही रोज मोबाईल चेक करतोय मँसेज सुद्धा आला नाही असे विठ्ठल जाधव म्हणाले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा जाऊन बघितलं पैसे आले नाही, दिवाळी आली दोन दिवसात पैसे पडतात म्हणून वाट बघत आहे. रोज न्यूज वर येत एवढे पैसे टाकले मात्र आम्हाला तर एकही रुपया आला नाही.शंभर टक्के नुकसान होऊन सुद्धा आम्हाला रुपया आला नाही,
तुम्ही मागे सुद्धा आमची बातमी लावून धरली होती या बारीला ही, आम्ही तुमची TV9 फार आभार मानतो आमच्या शेतकऱ्याच्या कळवळीसाठी इथपर्यंत धावून तरी येता, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.

आमच्यासाठी काळी दिवाळी

अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील कांदा, टोमॅटो, बटाटा, सोयाबीन अशा सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकवलेला माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे किंवा तो फेकून देण्याची वेळ आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील दिवाळीची रोषणाईही फिकी पडली असून, शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आमच्या शेतकऱ्यांची ही काळी दिवाळी झाली आहे अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुक्यातील शेतकरी सुदाम इंगळे यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील शेतकरी सुदाम इंगळे यांनी या हंगामात कांद्यासाठी तब्बल ६६,००० रुपये खर्च केले. मात्र, सततच्या पावसामुळे त्यांचे बहुतांश पीक खराब झाले. जे काही पीक वाचले, ते विकण्यासाठी त्यांनी १५०० रुपये खर्च करून पुणे बाजार समितीत आणले.
पण तिथे त्यांना ७.५ क्विंटल कांद्यासाठी अवघे ६६४ रुपये मिळाले. म्हणजेच, प्रति किलो अवघे ८८ पैसे! इंगळे यांनी सांगितले की, “हे एका एकरातील उत्पन्न आहे. माझ्याकडे अजून १.५ एकर कांदा आहे, पण तो मी विकणार नाही. तो जमिनीत नांगराने फिरवून खत म्हणून वापरेन. ते विकण्यापेक्षा जास्त फायद्याचे आहे. मी अजूनही मोठा शेतकरी आहे. ज्यांच्याकडे एक-दोन एकर जमीन आहे आणि ज्यांनी कर्ज घेतले आहे, ते कसे जगतील, मला माहीत नाही. सरकारने मदत केली नाही, तर शेतकरी आत्महत्या वाढतील.” असा इशारा त्यांनी दिला.