Dharmveer Trailer CM speech : शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच आनंद दिघेंनी कट्ट्रर शिवसैनिक घडवला, निष्ठा पाहण्यासाठी हा सिनेमा पाहा, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
ते आपल्यातनं गेले तेव्हा त्यांचं वय होतं ५० होतं. पण दिवसरात्रीचा हिशोब केला तर हा माणूस १०० वर्ष जगला. आणि नुसताच जगला नाही तर त्याने अनेकांना जगवलं. जोपासलं. त्यामुळे या ज्या काही पदव्या, उपाध्या असतात त्या कुठल्या कॉलेजमधून मिळत नाहीत, मागून मिळत नाहीत, त्या जनतेनी द्याव्या लागतात. हिंदूह्रद्यसम्राट असेल धर्मवीर असेल, हे जनता ठरवत असते, जनता देत असते. या पिक्चरचं नाव आहे धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे. त्याच्यापुढे आणखी पाहिजे ठाणेकरांचं ह्रद्य.,,वाचा मुख्यमंत्र्यांचं पूर्ण भाषण
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray)यांच्याप्रमाणेच धर्मवीर आनंद दिघे (Dharmveer Anand Dighe)यांनी कट्टर शिवसैनिक घडवला. धर्मवीर हा सिनेमा निष्ठा कशी असते यासाठी सगळ्यांनी पाहावा, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धर्यामवीर आनंद दिघे यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. अभिनेता सलमान खान, (Salman Khan)आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं हे संपूर्ण भाषण
उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण
काही कही क्षण असे असतात की शब्द सुचत नाहीत, आपण त्या काळात जातो आणि आपल्याला शब्द सुचत नाहीत. आता तसं झालेलं आहे. एकनाथ तुम्ही आपल्या ठाण्याच्या रिवाजाप्रमाणे शाल आणि गुच्छ रितीरिवाज म्हणून दिला. आणि नकळत माझ्या तोंडून शब्द उमटले, शाब्बास नाव राखलंत, निष्ठा राखलीत. ही चित्रपटाची झलक आहे आणि ती झलक बघत असताना, सेना म्हणजे काय शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता कार्यकर्ता नाही तर गुरु आणि शिष्य असं एक नातं जपणारा, जगातला हा एकमेव पक्ष असेल आणि या भावना असल्यामुळेच अनेकांनी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले, शिवसेना संपवण्याचा पण ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांना त्यांना संपवून शिवसेना त्यांच्यापुढे गेली. आनंद दिघे म्हटलं की ते दिवस आठवतात. त्यात बाळासाहेबांसोबतचा एक क्षण दाखवलाय. गुरुपोर्णिमा हा वेगळा भाग, पण थोडसं त्यांच्यावर ते रागावलेले आहेत. ते पण नेहमीचं असायचं आणि तीही परंपरा ठाणेकरांनी राखलेली आहे. इथेही बाकीचे ठाणेकर बसलेले आहेत. सकाळी ११ ची वेळ दिली, ते किती वाजता येतील तेव्हा त्यांचे ११ वाजलेले असतात. आणि हे त्यावेळला सुद्धा व्हायचं. बाळासाहेब तुम्हाला कल्पना आहेच, वेळेचे भोक्ते, वेळ म्हणजे वेळ. घड्याळ्याच्या काट्यावरती गोष्टी झाल्याच पाहजेत आणि मग आनंद दिघेंना जर सकाळी ११ ची वेळ दिलेली असेल तर दोन वाजेपर्यंत त्यांचा पत्ता नसायचा. मग ते दोन वाजता यायचे तोपर्यंत बाळासाहेब चिडलेले असायचे. पण गंमत सांगतो हा सगळा जो राग असायचा, दिघे साहेब समोर येऊन उभे राहायचे, एका शब्दानेही बोलायचे नाहीत. समोर आल्यानंतर तो राग सगळा वाहून जायचा आणि मग त्यांच्यातलं प्रेम पाहायला मिळायचं. निष्ठा म्हणजे किती निष्ठा, सलमान तुम्ही तुमची दोन साम्य सांगितली पण आणखी एक राहिलं ते म्हणजे दोघेही दबंग. पण एक पिक्चरमधला एक जीवनातला. या सगळ्या भूमिका करायला खूप कठीणपण असतात. पण प्रत्यक्ष तसं जगणं कठीण असतं. आत्ता एक पिक्चर पाहिला झुकेगा नाही, तसे सगळे शिवसैनिक. आनंद दिघेसुद्धा झुकेगा नाही. हिमंत असेल तर टक्कर दे. तू राहशील किंवा मी राहीन. आणि ही लाख मोलाहूनही मोठी माणसं, साथी सोबती. ज्या वेळेला शिवसेनाप्रमुखांना मिळाली, त्यांच्या मुशीतून, तालमीतून तयार झालेले हे शिवसैनिक माझे सोबती म्हणून जेव्हा मला लाभले, यापलिकडे भाग्य म्हणजे काय असतं. एकदा मी कल्याण–डोंबिवलीला गेलेलो. संध्याकाळची वेळ होती. कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिक होते, म्हणाले दिघे साहेबांनी बोलावलं आहे. मी म्हटलं जाना किती उशीर करणार, ते म्हणाले ठाण्याची भेट अशी असते की रात्री शेवटची गाडी पकडून जायचं आणि सकाळची गाडी पकडून परत यायचं. रात्री २ आणि ३ वाजता दिघेसाहेब भेटतात आणि आमचं ऐकून घेतात. म्हणजे मला कळत नाही एका रात्री कल्याण डोंबिवलीकरांना, दुसरी रात्र इतरांना. मला एक कळायचं नाही हा माणूस झोपायचा कधी. ते आपल्यातनं गेले तेव्हा त्यांचं वय होतं ५० होतं. पण दिवसरात्रीचा हिशोब केला तर हा माणूस १०० वर्ष जगला. आणि नुसताच जगला नाही तर त्याने अनेकांना जगवलं. जोपासलं. त्यामुळे या ज्या काही पदव्या, उपाध्या असतात त्या कुठल्या कॉलेजमधून मिळत नाहीत, मागून मिळत नाहीत, त्या जनतेनी द्याव्या लागतात. हिंदूह्रद्यसम्राट असेल धर्मवीर असेल, हे जनता ठरवत असते, जनता देत असते. या पिक्चरचं नाव आहे धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे. त्याच्यापुढे आणखी पाहिजे ठाणेकरांचं ह्रद्य. अशी ही व्यक्ती. त्यांना व्यक्ती मानावे तरी कसे, त्यांनी अशा काही गोष्टी केल्या ज्या चमत्कारिक वाटतात. आणि म्हणूनच दिघे साहेब म्हटल्यानंतर ठाणेकरच नाही तर शिवसैनिकांचे डोळेसुद्धा एका आठवणीने ओलावतात. सगळे भारावतात. आणि असा माणूस पुन्हा पुन्हा होणे नाही. मी ठाणेकर आणि शिवसैनिकांना एकच सांगेन की हा जो पिक्चर आहे, तो पिक्चर म्हणून न पाहता निष्ठा म्हणजे काय असतं, याचं त्यातनं तुम्हाला दर्शन मिळेल. त्यांनी शिवसेनाप्रमुखांकडे आयुष्यभरात काय मागितलं, काय निवडणुकीचं तिकिट मागितलं का., जशी शिवसेनाप्रमुखांनी माणसं घडवली तशीच आनंद दिघेंनी सुद्धा कडवट, कट्टर शिवसैनिक, कापला गेला तरी फुटणार नाही अशी जी निष्ठा या सगळ्यांच्या धमन्यांमध्ये भरली म्हणून अशी जी माणसं, आपल्यात कायमची राहावी असं जरी वाटत असलं, तरी शेवटी आय़ुष्य असतं. ती नसली तरी कोणत्या ना कोणत्या विचाराने, कृतीने, प्रेरणेनं, रुपाने, स्फूर्तीने आपल्यात राहतात, ती तशीच राहतील. हे श्रद्धास्थान अबाधित राहील. एकनाथजी तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी मोठं काम केलं आहे. पिक्चर काढणं हा एक भाग झाला, पण या विषयावर पिक्चर काढणं, हे कार्य पुढे नेणं, कमाल आहे. सर्व टीमला शिवसैनिक, हिंदू आणि महराष्ट्राच्या वतीनं अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट !
</p>