
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा (Local Body Election Update) बिगुल पुढील महिन्याच्या अखेरीस वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिनी मंत्रालयासह महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांचा नारळ पुढील महिन्यात फुटण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाला या निवडणुकीविषयी सुप्रीम फटकारे बसले आहेत. दरम्यान राज्यात स्वबळाचे नारे उंचावल्याचे एकंदरीत चित्र आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा धर्म स्थानिक पातळीवर पाळल्याच जाईल असे वाटत नाही. अनके ठिकाणी स्थानिक नेत्यांनी युती आणि आघाडीऐवजी एकला चलो रेचा नारा दिला आहे. तर काही ठिकाणी त्यांनी युती, आघाडीची तयारी सुरू केली आहे. राज्यातील काही ठिकाणची ही वानगी दाखल उदाहरणं स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींची नांदी दाखवत आहेत.
जळगावमध्ये शिंदे सेनेचा वरचष्मा
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल अशी घोषणाच करून टाकली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना भाजप सोबत युती करणार नाही असेही किशोर पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले अमोल शिंदे यांनी अपक्ष म्हणून माझ्या विरोधात दोनदा निवडणूक लढवली. आतून बाहेरून टेबलाखालून त्यांना मदत केली जाते हे सर्वश्रुत आहे असे किशोर पाटील म्हणाले. युती करूनही पाठीत खंजीरच खुपसत असणार तर समोरासमोर असल्यावर सावध तरी राहतो अशी प्रतिक्रिया किशोर पाटील यांनी दिली.
पाठीत खंजीर खुपसून स्वतःचा मडर करून घेण्यापेक्षा समोरासमोर लढलेलं बरं. मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाचोरा, भडगाव मतदार संघात शिवसेना स्वबळावर लढणार. महाराष्ट्रातला मी पहिला आमदार असेल मी माझ्या मतदारसंघात युती होऊ देणार नाही, स्वबळावर लढेल. जेवढे माझ्या विरोधात लढले त्यांना कळालं दोन टर्म पासून आपण किशोर पाटीलला थांबवू शकत नाही.
विरोधकांशी युती कशी करू?
सर्वांनी एकत्र येऊन किशोर पाटीलला थांबवायचा प्रयोग केला आहे. मात्र पाचोरा भडगाव मतदार संघातील जनता आणि शिवसैनिक माझ्या पाठीशी खंबीर उभे आहे.बुथप्रमुखांच्या मेळाव्यात मी घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाचोरा, भडगाव मतदार संघात शिवसेना स्वबळावर लढेल.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट बघितले तर ज्या ज्या मतदार संघामध्ये जशी परिस्थिती आहे त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. माझ्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष जर उद्या माझी खाट टाकणार असेल, जे माझ्या विरोधात लढले ते सर्व विरोधक एक केले. मी त्यांच्यासोबत कसे लढायचे? सर्व माझ्या विरोधात लढले मी त्यांच्याशी युती कशी करू. सर्व जरी एकत्र आले तरी दूधच दूध आणि पाणीच पाणी होईल.
रेखा मालचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
पाचोरा भडगाव मतदार संघातील दोघेही नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 100% जागांवर शिवसेनेचा भगवा फडकेल. भडगाव नगरपालिकेची महिला एसटी प्रवर्गाची जागा निघाली आहे, त्या जागेवर मी उमेदवारी घोषीत केली आहे. रेखा प्रदीप मालचे यांना मी भडगाव नगरपालिकेची लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे.
पाचोरा नगरपालिकेचा विषय मी कार्यकर्त्यांवर सोडला आहे. अर्ध्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की माझ्या पत्नीला द्यावे तर अर्ध्यांचं म्हणणं आहे माझ्या मुलीला उमेदवारी द्यावी. एक नोव्हेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी निर्धार मेळावा ठेवला आहे. त्या दिवशी ही उमेदवारी जाहीर करेल, असे आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केले आहे.
नाशिकमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा?
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा दिसू शकतो. भाजपाने सगळ्या 122 जागा स्वबळावर लढवाव्यात असे पत्र भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेशाध्यक्षांना पाठवले आहे. नाशिकमध्ये भाजपची मोठी ताकद आहे. भाजपाला इतर कोणाच्याही कुबड्या घेण्याची आवश्यकता नाही. बूथ पातळीवर भाजपची स्वतःची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. प्रत्येक प्रभागात भाजपकडे स्वतःचे 4 ते 5 जण इच्छुक असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले.
धाराशिवमध्ये सुद्धा भाजपचे एकला चलो रे
धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वतंत्र लढणार आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले. एक ना एक जागा महायुतीची आली पाहिजे म्हणत म्हणत, नाही भाजपचीच आली पाहिजे असं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शब्दप्रयोग केला. जिल्ह्यात सगळीकडे भाजपचा उमेदवार निवडून येईल हा विचार करावा अशी भूमिका राणाजगजीतसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.
आपलं चिन्ह कमळ आणि उमेदवार देवा भाऊ हा विचार करा अशा त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी मेळावा घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक जागा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आली पाहिजे , राणाजगजितसिंह पाटील यांनी भूमिका जाहीर केली. मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भूमिकेचा आवर्जून उल्लेख करत कार्यकर्त्यांकडून स्वतंत्र लढण्याची मागणी करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
रायगडमध्ये सेना-राष्ट्रवादी एकत्र
रायगडमध्ये झेडपी निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीची शक्यता आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला तयार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली. झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास शिवसेना (शिंदे गट) तयार असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे. गोगावले यांनी सांगितलं की, युतीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार असून तो राष्ट्रवादीसमोर ठेवण्यात आला आहे. आता राष्ट्रवादी या प्रस्तावावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रायगडच्या झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.
गडचिरोलीत राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार अशी घोषणा धर्मराव आत्राम यांनी केली. गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळावा चामोर्शी येथे झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव आत्राम यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार चामोर्शीतून अर्ज सुरुवात केली आहे. यावेळी वेगवेगळ्या पक्षातून, राष्ट्रवादी अजित पवार गटात कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी प्रवेश केला. अहेरी विधानसभेतील पाच तालुक्यात १९ जिल्हा परिषद चे सिटा राष्ट्रवादी पक्ष स्वतःच्या बळावर निवडणूक लढण्याची घोषणा आमदार धर्मराव आत्राम यांनी केली.
काही ठिकाणी मैत्री लढत लढू तेही महायुतीने काही प्रस्ताव ठेवला तर विचार करू नाहीतर 51 जागांवर निवडणूक लढण्याची राष्ट्रवादी पक्षाची तयारी असल्याचे आत्राम जाहीर केले. भाजप पक्ष तिकडे दावेदारी करत आहे तर इकडे राष्ट्रवादी पक्ष आपली स्वतःची दावेदारी ५१ जागांवर आहे महायुतीत एक नवीन राजकारण गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
नंदुरबारमध्ये भाजपने शड्डू ठोकले
नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागले असून, भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहादा येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. पक्षाने दिलेल्या आदेशाच्या पालन करणार असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री युती बाबत निर्णय घेतील, मात्र आम्ही स्वबळावर देखील निवडणूक लढू याची तयारी देखील आमचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. शहादा नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता येण्यासाठी सर्वेच कार्यकर्ते आणि उमेदवार कामाला लागले आहेत निवडणुकीचे बिगुल वाजला असून राज्यात मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकेंवर भाजपाची एक हाती सत्ता राहणार आहे कारण गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भाजपाचे कार्यकर्ते असून आणि लोकांच्या विश्वास फक्त आता भाजपावर राहिला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पूर्ण ताकतीने समोर ज्यांना असून आणि निवडणूक ही जिंकणार असल्याचे विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.