महाराष्ट्राने अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, कोरोना संकटालाही डगमगणार नाही, जयंत पाटलांचा विश्वास

| Updated on: May 01, 2021 | 11:32 AM

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. (Maharashtra Day 2021 Jayant Patil on Corona Pandemic)

महाराष्ट्राने अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, कोरोना संकटालाही डगमगणार नाही, जयंत पाटलांचा विश्वास
जयंत पाटील
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी – सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. (Maharashtra Day 2021 Jayant Patil on Corona Pandemic)

कोरोना विरुध्द लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्यांना आदरांजली

डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील प्रत्येकजण आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत आहे. जनता संयमाने शासनाचे नियम पाळत आहेत. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपला कणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेईल, असेही जयंत पाटील म्हणाले. तसेच संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच कोरोना विरुध्द लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना त्यांनी आदरांजली वाहिली.

अजित पवारांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 

तर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. तसेच महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

“महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल”

राज्यावरील कोरोना संकटाविरुध्द राज्य एकजुटीने, निर्धाराने लढत आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य नागरिकांचे जीव वाचवण्याला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने नाईलाजाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्वांची एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.  (Maharashtra Day 2021 Jayant Patil on Corona Pandemic)

“लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न” 

राज्यातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचेही नियोजन करण्यात आले आहे. या वयोगटातील राज्यातील 6 कोटी लोकसंख्या लक्षात घेऊन दोन्ही डोस विचारात घेऊन 12 कोटी डोसचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत अर्थ विभागाने आर्थिक नियोजन केले आहे. लसीकरणासोबतच ऑक्सिजन पुरवठा, बेड व्यवस्थापन, रेमडीसीवीर उपलब्धता, औषधांचा पुरवठा यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

“बेड उपलब्ध होत असल्याने रुग्णसंख्या घटत असल्याचे संकेत”

साखर कारखान्यांनाही राज्य शासनाने ऑक्सिजन निर्मितीबाबत आवाहन केले आहे. ऑक्सिजन प्लँट उभारुन ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. तसेच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होत आहेत. हे रुग्णसंख्या घटत असल्याचे संकेत आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.  (Maharashtra Day 2021 Jayant Patil on Corona Pandemic)

संबंधित बातम्या : 

वारंवार आवाहन करुनही लोक विनाकारण घराबाहेर पडतायत, याची किंमत मोजावी लागेल: जयंत पाटील

Maharashtra Day 2021 | राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून हुतात्म्यांना अभिवादन

Maharashtra Day 2021 | मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा, सर्वपक्षीय नेत्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा