MLC Election 2022: हुश्श… शिवसेनेची अतिरिक्त चार मते काँग्रेसला मिळणार; भाई जगताप यांचा विजय सोपा?

| Updated on: Jun 20, 2022 | 1:27 PM

MLC Election 2022: विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने या निवडणुकीची चुरस वाढली होती. त्यामुळे काँग्रेसच्या भाई जगतापांचं काय होणार? असा सवाल केला जात होता.

MLC Election 2022: हुश्श... शिवसेनेची अतिरिक्त चार मते काँग्रेसला मिळणार; भाई जगताप यांचा विजय सोपा?
शिवसेनेची अतिरिक्त चार मते काँग्रेसला मिळणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमदेवारांना मतदान का करायचं? असा सवाल कालपर्यंत शिवसेनेचे आमदार करत होते. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेनेची अतिरिक्त चार मते मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, शिवसेनेने (shivsena) अखेर चार अतिरिक्त मते काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीने त्यांची अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवल्यास आणि बविआने तीन मते महाविकास आघाडीच्या  (maha vikas aghadi) पारड्यात टाकल्यास काँग्रेसच्या भाई जगतापांचा विजय सोपा होणार असल्याचं मानलं जात आहे. मात्र, आघाडीच्या मतात फूट पडल्यास जगताप यांना विजय कठिण जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने या निवडणुकीची चुरस वाढली होती. त्यामुळे काँग्रेसच्या भाई जगतापांचं काय होणार? असा सवाल केला जात होता. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाई जगतापांपासून ते काँग्रेसच्या सर्वच बड्या नेत्यांनी आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अपक्ष आमदारांशी संपर्क साधला होता. तसेच छोट्या पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा केली होती. त्याशिवाय भाजपमधील आमदारांशीही काँग्रेस नेत्यांनी संपर्क साधल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यात शिवसेनेच्या आमदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला मतं देण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती. मात्र अखेर हा तिढाही सुटला आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसला मतांची गरज किती?

विधान परिषद निवडणुकीत जिंकण्यासाठी 26 मतांची गरज आहे. काँग्रेसकडे 44 मते आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे 18 मते उरतात. त्यांना विजयासाठी 8 मतांची गरज आहे. एमआयएमने एक मत काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसची मते 18 झाली आहेत. आता शिवसेनेने चार अतिरिक्त मते काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसची मते 22 वर पोहोचली आहे. विजयासाठीची 4 मते राष्ट्रवादीकडून काँग्रेसला दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय बविआ काय निर्णय घेते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे भाजप या निवडणुकीत काय खेळी खेळते यावरही जगताप यांच्या विजयाची गणितं अवलंबून आहेत, असं सांगितलं जात आहे.

भाजप-राष्ट्रवादीची मतदानात बाजी

दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदानात बाजी मारली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सकाळीच विधान भवनात येऊन मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या क्षणी कोणतीही गफलत होऊ नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मतदान करून घेण्यास सांगितलं होतं. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी मतदान केलं. सकाळी 10 वाजेपर्यंत 68 आमदारांनी मतदान केलं होतं.

भाजपचं गणित काय?

भाजपकडे 106 आमदार असून त्यांना सहा अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपच्या मतांची संख्या 112 इतकी झाली आहे. जिंकण्यासाठी 26 मतांची गरज आहे. भाजपचे पाच उमेदवार मैदानात आहेत. त्यापैकी चार उमेदवार निवडून गेल्यानंतर 8 अतिरिक्त मते उरतात. प्रसाद लाड यांना विजयासाठी आणखी 18 मतांची गरज आहे.

शिवसेना, राष्ट्रवादीची स्थिती काय?

शिवसेनेकडे अपक्ष मिळून 62 मते आहेत. राष्ट्रवादीकडे 51 मते आहेत. राष्ट्रवादीकडे तीन अपक्ष आणि सपाची दोन असे पाच आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 8 मतांची गरज असून त्यांची सर्व भिस्त शिवसेनेच्या चार अतिरिक्त मतांकडे आहे.