कुठे रॅली, तर कुठे भव्य रोड शो; आज प्रचाराचा शेवटचा दिवस, बालेकिल्ला राखण्यासाठी दिग्गज मैदानात
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराची तोफ आज थंडावणार! मुंबई, पुणे, नागपूरसह महत्त्वाच्या शहरांत दिग्गज नेत्यांचे शक्तिप्रदर्शन. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान; वाचा सविस्तर बातमी.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पुणे, मुंबई, नागपूर, डोंबिवली आणि जळगावसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आज सायंकाळी ५:३० वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे. मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना पुणे, डोंबिवली आणि जळगावमध्ये जोरदार प्रचार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी झालेले राडे आणि पैसे वाटपाच्या आरोपांमुळे निवडणुकांचे वातावरण कमालीचे तणावपूर्ण पाहायला मिळत आहे.
पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन
पुणे महानगरपालिकेच्या १६३ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराच्या सांगता दिनी प्रमुख नेत्यांचे दौरे पुण्यात होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात जाहीर सभा आहे. यावेळी ते भाजपची बाजू भक्कम करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शहरात भव्य रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यात असून त्यांच्या गाठीभेटींमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे शहरातील मतदानासाठी शहरात १२ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ईव्हीएम आणि मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी १०५६ पी.एम.पी. बस सज्ज आहेत. विशेष म्हणजे, मकोका अंतर्गत अटकेत असलेला गजानन मारणे याला उच्च न्यायालयाने मतदानासाठी दोन दिवस पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे.
बालेकिल्ला राखण्याचा प्रयत्न
तर नागपुरातही प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दुचाकी चालवत रोड शो करणार आहेत. हा रोड शो इतवारी भारत माता चौक ते महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे भाजप आपला बालेकिल्ला राखण्याचा प्रयत्न करत आहे.
संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि नागरिकांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्टीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष दक्षता पथकाची स्थापना केली आहे. मुंबईतही कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
