
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे यांसारख्या २९ महत्त्वाच्या महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. आता नुकतंच मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या असल्या तरी अनेक शहरांमध्ये ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात अनेक शहरांत ईव्हीएम (EVM) बिघाडामुळे लोकशाहीच्या या उत्सवाला तांत्रिक अडचणींचे गालबोट लागले आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या एकूण २,८६९ जागांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात असून, साधारण ३.४८ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मुंबई वगळता इतर २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग (पॅनेल पद्धत) असल्याने मतदारांना ३ ते ५ उमेदवारांना मते द्यावी लागत आहेत, ज्यामुळे काही ठिकाणी संभ्रमाचे वातावरणही दिसून आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला. गुजराती कन्या शाळा येथील मतदान यंत्र तब्बल एक तास बंद होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मतदार आक्रमक झाले आणि केंद्रावर गोंधळ उडाला. तर बेगमपुरामधील ज्ञानेश्वर विद्यालय येथे अर्धा तास मतदान थांबले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत वाया गेलेला वेळ वाढवून न दिल्यास निवडणूक आयोगाकडे दाद मागू, असा इशारा दिला आहे.
नवीन नाशिकमधील प्रभाग २९ आणि मॉडर्न हायस्कूलमध्ये मॉक पोल (चाचणी मतदान) यशस्वी झाले. मात्र प्रत्यक्ष मतदानावेळी यंत्रांनी Error दाखवल्याने मतदारांना ताटकळत राहावे लागले. तर जळगावातील उर्दू शाळा क्र. १५ वरील केंद्रावर यंत्रांच्या मांडणीचा क्रम चुकल्याने उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. यामुळे अधिकारी आणि प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्यावर नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तोडगा काढला.
सोलापूरच्या प्रभाग २४ मधील संगमेश्वर महाविद्यालय केंद्रावर यंत्र बंद पडल्यावर काँग्रेस उमेदवार राहुल शर्मा यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या मते, यंत्र बंद पडल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी साधे तंत्रज्ञही वेळेवर उपलब्ध नव्हते, ज्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूलमधील केंद्र क्र. १२ वर अर्ध्या तासापासून यंत्र बंद असल्याने रांगा वाढल्या होत्या. तर धुळ्यातील प्रभाग ४, ५, १० आणि ११ सह देवपूर परिसरातील उर्दू हायस्कूलमध्ये २० मिनिटे तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. तसेच अमरावती गर्ल्स हायस्कूल केंद्र २३ येथे सकाळी ७:३० पासूनच यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाची सुरुवातच उशिरा झाली.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अतिरिक्त ईव्हीएम (Buffer Stock) वापरण्याचे आणि तंत्रज्ञांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत तांत्रिक बिघाड झाल्यास निकाल पाहण्यासाठी पाडू (PADU) या विशेष सहायक यंत्राची व्यवस्था प्रथमच करण्यात आली आहे. आजच्या या अटीतटीच्या लढतीचा निकाल उद्या, १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे.